तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी ‘अस्पृश्यता-मीमांसा’ शीर्षक संस्कृत प्रबंध लिहिला आहे. तो औंध संस्थानचे अधिपती भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाधिपती कारकीर्दीच्या रौप्य महोत्सवानिमित्त १९३४ मध्ये प्रकाशित ‘श्री भवानराव गौरव ग्रंथ’मध्ये प्रसिद्ध झाला होता. या प्रबंधात तर्कतीर्थांनी अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजासंदर्भात तत्कालीन पुरोहित वर्गाने आपले वर्णवर्चस्व अबाधित राखण्यासाठी प्राचीन वाङ्मयाचा हवाला देत ज्यांना चांडाळ संबोधून अस्पृश्य ठेवले, तेच मूळ तत्कालीन वेद, श्रुती, स्मृती, पुराण, अरण्यक, ब्राह्मण ग्रंथ, उपनिषद इ. धर्मग्रंथांत उपलब्ध प्रमाणांच्या विरुद्ध होते, हे सप्रमाण दाखवून दिले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय राजकारणास १९३० च्या कायदेभंग आंदोलनामुळे गती आली. ब्रिटिश सरकारने स्थानिक राज्यकारभारात भारतीयांना सहभागी करून घेण्याच्या धोरणानुसार ज्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या होत्या, त्यातील मतदारसंघ रचना व मतदार हक्क यांवरून महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. महात्मा गांधी या प्रश्नाकडे सामाजिक दृष्टीने पाहत, तर दलितांचे हक्क हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राजकीय प्रश्न मानत. त्यांची अशी धारणा होती की, भारतीय राजकारणात दलितांचे हक्क त्यांचे प्रतिनिधी जितक्या तीव्रपणे मांडतील तितके अन्य नाही. म्हणून त्यांच्यासाठी राखीव मतदारसंघ असावेत, जेणेकरून त्यांचे प्रतिनिधी विधिमंडळ व लोकसभेत जाऊ शकतील. याप्रश्नी विरोध करत महात्मा गांधींनी आमरण उपोषण आरंभले होते. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये ‘पुणे करार’ (२४ सप्टेंबर, १९३२) होऊन प्रश्न संपला खरा; पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या हक्क नि प्रश्नांबाबत जी राजकीय व सामाजिक जागृती घडवून आणली, त्यामुळे महात्मा गांधीही अंतर्मुख झाले व अस्पृश्यता निवारण ही काळाची गरज असल्याचे त्यांना मनोमन पटले; पण त्यांच्या सनातनी मनास यास हिंदू धर्मग्रंथांमध्ये काही प्रमाण मिळते का, ते पाहायचे होते. म्हणून त्यांनी हिंदू सनातन व सुधारक धर्मपंडितांशी येरवडा कारागृहात विचारविमर्श सुरू केला.
सुधारक धर्मपंडितांनी महात्मा गांधींना अस्पृश्यता निवारण, हरिजन मंदिर प्रवेश इत्यादींसंबंधी धर्मशास्त्रीय आधार उपलब्ध करून दिले. त्याआधारे महात्मा गांधींनी वरील मान्यवरांचे एक प्रातिनिधिक ‘अस्पृश्यता निवारण निवेदन’ आपल्या ‘हरिजन’ या इंग्रजी साप्ताहिकाच्या पहिल्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्यात तीन प्रकारची अस्पृश्यता नमूद करून स्पष्ट करण्यात आली होती की, ‘‘ Thus it is necessary that rights common to the four varnas, e. g. of entry into temples, educational institutions, of use of public wells, ghats, tanks, rivers should equally secure to the untouchables so called; and it is wrong to deprive them of such common rigths. This is provable from texts, the fundamental principles and the spirit of the Dharma Shastra.’’
वरील निवेदनातील धर्मशास्त्र प्रमाण म्हणजे ‘अस्पृश्यत्व-मीमांसा’ होय. उपरोक्त निवेदनात आणि चर्चित प्रबंधातून हे स्पष्ट होते की, हिंदू धर्मशास्त्रानुसार तीन प्रकारचे अस्पृश्य वर्णिले गेले आहेत. आज ज्यांना अस्पृश्य मानले जाते, त्यांच्या संबंधाने असलेली वर्तमान स्थिती ही तत्कालीन अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या वर्गाच्या स्थितीपेक्षा सर्वथा वेगळी आहे. त्यामुळे तत्कालीन आधार व प्रमाणे वर्तमान वर्गास लागू होत नाहीत. कोणत्याही कारणाने कोणासही अस्पृश्य ठरविले गेले तरी त्यांच्या शुद्धी, मुक्तीच्या संबंधी प्रायश्चित्त विधाने आहेत. त्यामुळे अन्य उच्च वर्णांतील लोकांप्रमाणे अस्पृश्य समाजास सर्व हक्क व अधिकार आहेत, हे तर्कतीर्थांनी या प्रबंधात विस्ताराने मांडले आहे. त्या प्रमाणांचा विचार करता वर्तमानात कोणासही अस्पृश्य मानता येणार नाही, या अनुरोधाने तर्कतीर्थांनी केलेले प्रबंधातील विवेचन मुळातूनच वाचले पाहिजे. तर्कतीर्थ समग्र वाङ्मय प्रकल्पातील बाराव्या खंडात हा संस्कृत प्रबंध अंतर्भूत असून, सर्वांना वाचणे, कळणे सुलभ व्हावे म्हणून मूळ संस्कृत प्रबंध संहितेस जोडून त्याचे मराठी भाषांतरही देण्यात आले आहे.
drsklawate@gmail.com