तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी लिहिलेला प्रथम ग्रंथ म्हणजे ‘आनंदमीमांसा’. तो त्यांनी १९२८ मध्ये लिहिला. प्राज्ञपाठशाळा मंडळ, वाईने तो प्रकाशित केला होता. हा ‘प्रबंध लेखन’ (थिसिस) स्वरूपाचा ग्रंथ तर्कतीर्थांनी आपले गुरू नारायणशास्त्री मराठे यांना अर्पण करून ग्रंथदक्षिणेद्वारे गुरूप्रति आदर व्यक्त केला आहे.

जगातील सर्व तत्त्वज्ञानांचा विचार करून सुख-दु:खाच्या कसोटीवर त्यांचे वर्गीकरण करायचे झाल्यास असे सांगता येते की, तत्त्वज्ञाने वा दर्शने (फिलॉसॉफीज्) दोन प्रकारची असतात- (१) आनंदवादी, (२) दु:खवादी. अधिकतर भारतीय दर्शने ही दु:खवादी होत. ‘सांख्यदर्शन’, ‘न्यायदर्शन’, ‘योगदर्शन’, ‘बुद्धमत’, ‘ब्रह्ममीमांसा’ ही दु:खवादी दर्शने आहेत. महाभारतावर दु:खवादाचा प्रभाव आहे. आनंदमीमांसेचे उगमस्थान आपणास वेदान्तात अर्थात् उपनिषदांत दिसून येते. संहिताग्रंथ आणि ब्राह्मणग्रंथांत आनंदमय परब्रह्माचे विवेचन दिसून येते. ऐहिक जीवन व्यवहार, शरीर, कुटुंब, समाज हे सर्व शुद्ध, बलशाली व आनंदमय व्हावे, याकरिता वेदान्त ऋषी प्रयत्नशील असल्याचे लक्षात येते. वैदिक ऋषींची महत्त्वाकांक्षा विजयी समाज निर्मितीची होती. ‘छांदोग्य उपनिषद’ सत्य व सुख उपासना सांगते. वैदिक आर्य संस्कृतीत जो गृहस्थाश्रम वर्णिला आहे, तो आनंदनिधानस्वरूप आहे. वैदिक आर्यांचे देव व धर्मविषयक विचार आनंदसिद्धान्त (प्लेझर प्रिन्सिपल्स) आहेत.

असे असताना बौद्ध, जैन, संन्यासी, साधू, संत, इत्यादींनी दु:खवाद जोपासावा, याचे आश्चर्य वाटून तर्कतीर्थांनी ‘आनंदमीमांसा’चे लेखन केले. दु:खवादाने या देशाची दोन हजार वर्षे अनास्था झाल्याचे शल्य यामागे असून, ते दूर करण्याचा प्रयत्न या प्रबंधामागे दिसून येतो. यामागे विजयी मनोवृत्तीचा समाज निर्माण करण्याचा हेतू व ध्येय आहे.

सर्व आनंद एकरूप झाला, तर जीवन सुखपूर्ण होते. स्पर्धा, मत्सररहित समाज प्रयत्नशील असतो. तो ज्ञानी, पराक्रमी होतो. अशा समाजातच सुख, आनंदाचे नंदनवन नांदते. ‘बृहदारण्यकोपनिषद’मध्ये प्रेमरसाची चर्चा आहे. प्रेमविद्या, मधुविद्या म्हणजे आनंदविद्या होय. आत्मानंद एकरूपतासिद्ध असतो. ऐहिक आनंद हा परमानंद विरोधी नाही, हे तर्कतीर्थांनी या प्रबंधातून लक्षात आणून दिले आहे. ‘तैत्तरीय उपनिषद’ आनंदमहिमा सांगतो. ‘भगवद्गीता’ सुखवाद सांगते. तो सुखवाद सात्त्विक गुणयुक्त आहे. यात सुखात्मक सत्परिणाम हा सत्कर्माची कसोटी मानली गेली आहे. ती अंतिमत: समाजास रचनात्मक वा विधायक आनंदाकडे घेऊन जाते. शुद्धबुद्धीचेही असेच असते. शांती व सुखाने घडून येणारा लोकसंग्रह लाभकारी असतो. सुखमीमांसा हा सनातन धर्माचा पाया आहे.

सुखवादास सर्व प्रवृत्तींचा आधार मानले गेले आहे. व्यक्ती व समाजाच्या ऐहिक सुखाशी धर्मशास्त्र संबद्ध नसेल, तर धर्माचा कार्यभाग संपला असेच मानले गेले पाहिजे. सनातन धर्मशास्त्र मूलत: मानवी जीवन सुखमय करण्याच्या उद्देशाने अस्तित्वात आले, याचा आपणास विसर पडता कामा नये, हे तर्कतीर्थांनी या प्रबंधातून अधोरेखित केले आहे. सनातन धर्मशास्त्र हे मूलत: उत्कर्षशास्त्र आहे. या धर्माचा उगम वैदिक वाङ्मयात आहे. वैदिक आर्य आनंदवादी होते. धर्मशास्त्र हे मूलत: आनंदवादी होते, ते दु:खवादी, दैववादी लोकांनी मलिन केले, हे लक्षात घेतले पाहिजे. परलोकवादी विचाराने मूळ धर्मशास्त्राची कार्यक्षमता व सकारात्मक ऊर्जा क्षीण केली आहे. आधिभौतिक व आध्यात्मिक सुखवाद हा धर्माचा मूळ पाया आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ‘आनंदमीमांसा’ प्रबंधाची समीक्षा करताना प्रो. देवीदास वाडेकर यांनी म्हटले आहे की, ‘‘विजिगीषु समाजास इष्ट असणारे तत्त्वज्ञान यादृष्टीने हे विचार नि:संशय तेजस्वी व धीर देणारे असेच आहेत व समाजात त्याचा प्रचार अवश्य व्हावयास पाहिजे.’’ तर दुसरीकडे शि. स. अंतरकरांनी, ‘‘धर्म, नीती व मानवी प्रगतीस पोषक, प्रवर्तक वेदान्ताचा पुरस्कार’’ म्हटले आहे. या सर्वांतून ‘आनंदमीमांसा’चे महत्त्व स्पष्ट होते. ज्यांना जीवनाची समग्रता आणि गंभीरता समजून घ्यायची आहे, त्यांना ‘आनंदमीमांसा’ मार्गदर्शक ठरते. आनंद हा जीवनाचा चरमोत्कर्ष मानला गेल्याने त्यास ब्रह्मानंद म्हटले गेले आहे. आनंद विचार हा जीवनाचा एक रचनात्मक दृष्टिकोन आहे. आनंदानुभूती म्हणजे जीवनास लाभलेले एक असे वरदान आहे की, ज्यामुळे माणसाची जगण्याची उमेद वाढते व जगणे सुंदर होऊन जाते.
drsklawate@gmail.com