डॉ. उज्ज्वला दळवी

‘‘ॲलोपॅथी हे पाश्चात्त्यांचं नवं शास्त्र. आपल्या भारतीय प्रकृतीला ती औषधं मानवत नाहीत. आपण आपली जुनीच औषधं घ्यायची!’’ बंडूकाकांनी माजघरात जाहीरनामा काढला.अगदी बरोब्बर! अनेक जुने गैरसमज एकत्र उकळून केलेला काढाच आपल्याला मानवतो.

नवी उपचार पध्दती किंवा मॉडर्न मेडिसिन म्हणजे ॲलोपॅथी नव्हे. नवं वैद्यकशास्त्र नव्या वैज्ञानिक विचारसरणीतून निर्माण झालं आहे. ते पाश्चात्त्य देशांतून आपल्याकडे आलं हे खरं आहे. पण ती पाश्चात्त्यांची मक्तेदारी नाही. जगातल्या प्रत्येक देशाचा, प्रत्येक माणसाचा त्याच्यावर हक्क आहे.
१८४२ मध्ये हानेमान या जर्मन डॉक्टराने काटय़ाने काटा काढणारं नवं वैद्यकशास्त्र सुरू केलं. त्याच्या औषधांचे परिणाम मूळ आजाराच्या लक्षणांसारखेच असतात. म्हणून त्या नव्या वैद्यकशास्त्राला त्याने होमिओपॅथी (homeois =समान, pathy =आजार) हे नाव दिलं. आजाराच्या लक्षणांच्या विरुद्ध काम करणाऱ्या, त्या वेळच्या पाश्चात्त्य वैद्यकशास्त्राला अॅलोपॅथी (allos =विरुद्ध, pathy =आजार) हे नाव मिळालं. आयुर्वेद आणि युनानी वैद्यकाची औषधंही तशीच रोगलक्षणांच्या विरोधात काम करतात. त्यांनाही अॅलोपॅथी म्हणता आलं असतं.

ॲलोपॅथी, आयुर्वेद, युनानी वैद्यक या सगळय़ा जुन्या शास्त्रांच्या मते आजाराचं कारण आपल्या शरीरातच असतं, ते बाहेरून येत नाही. ‘शरीरातल्या प्रकृतींतलं (कफ-वात-पित्त) किंवा रसांतलं (ह्यूमर्स) संतुलन बिघडलं की आजार होतो,’ या तत्त्वाबाबत त्यांच्यात एकमत आहे. अठरा-एकोणिसाव्या शतकापर्यंत ते साधम्र्य तसंच चालू राहिलं. शिकाऊ इंग्रजांनी आयुर्वेदातल्या ज्ञानभांडाराचं भाषांतर केलं. हिंदूस्थानातल्या हकीम-वैद्यांकडून उपचार पद्धती शिकायचा प्रयत्न केला. तिन्ही पद्धती संस्कृत-उर्दूमधून एकत्र शिकवणाऱ्या संस्था काढल्या.

तेवढय़ात परिस्थिती बदलली.सतराव्या शतकात विल्यम हार्वेने रक्ताभिसरण संस्थेचा अभ्यास प्रसिद्ध केला. त्याच दरम्यान जुनाट, शिळय़ा झालेल्या पाश्चात्त्य विचारसरणीला सर फ्रान्सिस बेकननी तर्कशास्त्राची फोडणी दिली. सुशिक्षित डॉक्टरमंडळींचा मरगळलेला दृष्टिकोन त्या तडक्याने चटपटीत झाला. त्यांनी आजीबाईच्या बटव्यातल्या शेलक्या औषधरत्नांवर शुद्धीकरणाचे संस्कार केले. डिजिटॅलिस, मॉर्फीन, क्विनीनसारखी गुणी औषधं मोजूनमापून नेमक्या प्रमाणात देणं शक्य झालं. १८४७ मध्ये नव्या औषधशास्त्राचा रीतसर अभ्यास सुरू झाला. ‘बाळंतपण करण्यापूर्वी डॉक्टरने हात धुतले तर बाळंतिणीमध्ये तापाने फणफणून मरायचं प्रमाण कमी होतं,’ हे त्याच वर्षी सेमेलवाईस या हंगेरियन डॉक्टरने पुराव्यानिशी सिद्ध केलं. ‘आजारपणाचं कारण शरीराबाहेरून येत असावं,’ ही कुणकुण वैद्यकशास्त्राला लागली.

नवे सुधारक विचार अधिकारवाणीने दडपून टाकणाऱ्या, त्यांच्यावर निंदानालस्तीचे कोरडे ओढणाऱ्या प्रस्थापित ढुढ्ढाचार्याची पाश्चात्त्य जगात कमतरता नव्हती. पण युरोपच्या इतिहासाने नव्या ज्ञानाच्या बाजूने कौल दिला.अठरा-एकोणिसाव्या शतकातच इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली आणि ती युरोपभर पसरली. कारखान्यांच्या गावांत कामगारांची गर्दी झाली. शेकडो कामगार एका व्यवसायासाठी एकत्र आले. त्यांना व्यवसायातलं विज्ञान समजावणारे पॉलिटेक्निक वर्ग सुरू झाले. विज्ञानाची जाण तळागाळात पोहोचली. रोजगार टिकावा म्हणून तब्येतीची काळजी घेण्याचं महत्त्व वाढलं. कामगारांना व्यावसायिक दुखण्यांचं भान आलं आणि ते शास्त्रज्ञांपर्यंत पोचलं. धुराडी साफ करणाऱ्या मुलांच्या कॅन्सरवर मोठं संशोधन झालं. कामगारांच्या शब्दाला फारसा मान आलेला नसला तरी लोकशाहीची पहाट झाली होती. त्यामुळे त्या मुलांना आणि मग पर्यायाने इतरही कामगारांना संरक्षण देणारे कायदे झाले. दाटीवाटीने राहिल्यामुळे टीबी, टायफॉइड, कॉलऱ्यासारखे रोग फैलावले. प्रयोगशील डॉक्टरांनी १८५४ च्या कॉलऱ्याचा उगम शोधून काढायला लंडनच्या नकाशावर मयत रोग्यांच्या पत्त्यांचे ठिपके मांडले आणि त्याच्यावरून माग काढून, दूषित पाण्याचा पंप शोधून त्याचं हँडल मोडलं. साथ आटोक्यात आली. जलशुद्धीकरणाची, स्वच्छतेची मोहीम निघाली. कामगारांना आणि सरकारलाही डॉक्टरांची वैज्ञानिक विचारसरणी पटायला लागली.

पुढच्या दहा वर्षांत पाश्चर नावाच्या फ्रेंच शास्त्रज्ञाने कोंबडय़ांचा कॉलरा जंतूंमुळे होतो हे जाहीर प्रयोगाने दाखवून दिलं. लिस्टर या इंग्लिश डॉक्टरने पाश्चरच्या शोधांचा रोजच्या वैद्यकीय कामांत वापर केला. ऑपरेशन करताना जखमांत जंतू शिरू नयेत म्हणून जंतुनाशकाचा फवारा चालू ठेवला तर जखमा न पिकता लवकर बऱ्या होतात हे सिद्ध केलं. मग जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने र्निजतुक मलमपट्टय़ा बनवल्या. १८८४ मध्ये कॉलऱ्याची लस निघाली, १८९५ मध्ये क्ष-किरणांचा शोध लागला.

१९१४ मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि त्या सगळय़ा शोधांचा मोठेपणा लोकांना समजला. लशींमुळे साथी पसरल्या नाहीत. लढाईतल्या जखमांच्या वेदना मॉर्फीनने सुसह्य केल्या. दडलेली फ्रॅक्चर्स क्ष-किरणांनी शोधली. त्यांना नव्या प्रकारचे आधार देता आले. जखमा चिघळून होणारे मृत्यू जंतुनाशकांमुळे टळले. अनेक तरुण सैनिकांना नवजीवन मिळालं. तरुणाईला नव्या वैद्यकाची थोरवी समजली.

१९२८ मध्ये फ्लेमिंगने पेनिसिलिनचा शोध लावला. दुसऱ्या महायुद्धात पेनिसिलिनमुळे हजारो सैनिकांचे प्राण वाचले. तरुण मुलांत विज्ञानाचं भान फैलावलं. समाजाने नव्या वैज्ञानिक प्रयोगशीलतेचं स्वागत केलं. पाश्चात्त्य देशांनी नव्या उपचारपद्धती, औषधं आपलीशी केली.१८५७ च्या स्वातंत्र्यलढय़ाच्या वेळी नव्या वैद्यकशास्त्राचा युरोपात नुकताच प्रसार होत होता. भारताचा स्वातंत्र्यसंग्राम सुरू झाला तेव्हापासून तर पाश्चात्त्यांकडून येणारी प्रत्येक नवी गोष्ट धिक्कारायचाच प्रघात पडला. कॉलऱ्याची साथ गावंची गावं उद्ध्वस्त करत होती. हिवताप, न्यूमोनिया, गुप्तरोग होतेच. त्यांच्यावर उपाय म्हणून इंग्रजांनी नव्या प्रयोगशील शास्त्रातली नवी औषधं भारतात आणली. साथीसाठी लसही आणली. पण त्या सगळय़ा नवलाईशी असहकाराने टक्कर दिली. इंग्रज सरकार आणि भारतीय प्रजा यांच्यातले गैरसमज विकोपाला गेले. प्लेगची साथ आटोक्यात आणायला सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे बंडाची ठिणगीच पडली.

तिथेही विरोधाभास आहेच. त्याच दरम्यान विजेचे दिवे, मोटारगाडी, आगगाडी पाश्चात्त्यांकडूनच आली होती. तेव्हा ‘बिनबैलाची गाडी कशी हाकली रे!’ म्हणून कौतुकच झालं होतं. आता तर अवकाशझेप, रणतंत्र, संगणक वगैरेंत ‘पाश्चात्त्यांतेही पैजा जिंके’ अशी भारतीयांची मजल आहे. दर दोन वर्षांनी नवा मोबाइल फोन घेताना बंडूकाकांना तो परका वाटत नाही. त्याच्या तंत्रांशी ते झगडून ओळख करून घेतात. पण औषधांच्या बाबतीतला त्यांचा सापत्नभाव सरता सरत नाही.

कारण नव्या औषधांना घरोघरच्या नात्यातल्या, प्रेमाच्या बटवेवाल्या औषधदात्यांनी कायम कडाडून विरोध केला. ‘इंग्रजी औषधं उष्ण पडतात’, ‘साहेबी सायरपाने सर्दी सुकते’, ‘तापापेक्षा डॉक्टरच्या गोळय़ांनीच भयानक थकवा आला’ असं सतत सांगत रोगामुळे होणाऱ्या सगळय़ा त्रासाचं खापर त्यांनी नव्या औषधाच्या माथी फोडलं. त्या मायेच्या माणसांनी ‘इंग्रजी’ औषधांवर पोटतिडिकीने विरोधाचा संततवर्षांव केला. आत्ताआत्तापर्यंत भारतीय औषधगाथा मागील पानावरून पुढे चालू राहिली.

नव्या औषधशास्त्राची प्रगतीही तितकीच सातत्याने होत राहिली. प्रत्येक नव्या विजयाला तर्काचे, कठीण कसोटय़ांचे निकष लावून, स्वत:च्या चुका हुडकून त्या दुरुस्त करत, त्याच्यातून पुन्हा नवे शोध लावत ती अखंड वाटचाल चालूच राहिली. विज्ञानाच्या इतर शाखांमध्ये झालेल्या प्रगतीचाही तिला हातभार लागला. नवी प्रतिमातंत्रं, अतिसूक्ष्मदर्शक यंत्रं आली. आजारांमध्ये सूक्ष्म पातळीवर होणाऱ्या घडामोडी डोळय़ांनी बघता आल्या. शिवाय तिथले गोंधळ निस्तरायला औषधांमध्ये हवे तसे सूक्ष्म फेरफार करणं जमलं. एखादं शिल्प घडवावं तशी कल्पकतेने मनासारखी नवी औषधं घडवता यायला लागली. त्या कल्पकतेला प्रगत आणि प्रभावी संगणकाची जोड मिळाली. एकेका विकारासाठी नवा चपखल इलाज बेतून, घडवून, पारखून घेणं जमलं. भविष्यात तर प्रत्येक व्यक्तीच्या जनुककोशाचा तक्ता सहज उपलब्ध होईल. मग त्या माणसाची पूर्ण प्रकृती, त्याला भविष्यात होऊ शकणारे आजार, त्याची आयुर्मर्यादा सगळं लख्ख समजेल. मग प्रत्येक माणसासाठी त्याला नक्की मानवणारं, खास त्याचं, बिलकूल परकी नसलेलं, नवं औषध बेतता येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेवढय़ा सगळय़ा प्रगतीशी टक्कर देणं घरच्या आजीवैद्यांना जमणार नाही. शिवाय वैद्यकशास्त्राच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या विज्ञानाशी घरोघरींच्या नातवांची ओळख होतेच आहे. त्यांच्या बुद्धीला ते पटतं आहे. त्यांच्या मनातला नव्या औषधांविषयींचा आपपरभाव दूर होतो आहे. त्यामुळे बंडूकाका काही म्हणाले तरी नवी पिढी नव्या औषधांचं स्वागतच करणार आहे.
लेखिका वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त आहेत.
ujjwalahd9@gmail.com