चैतन्य प्रेम chaitanyprem@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिथे भक्ती आणि विरक्ती या सहजपणे नांदत असतात तिथं पूर्णप्राप्ती दासीप्रमाणे राबत असते, असं कवि नारायण सांगतो. भक्ती आणि विरक्ती सहजतेनं नांदत असतात, जणू त्यांचं ऐक्य हीच भक्ताची सततची सहजस्थिती बनते. म्हणजेच यातील एकही गोष्ट तो ओढूनताणून करीत नाही. तो भक्तीही बळे करीत नाही, की विरक्तही बळे होत नाही. कारण बळानं भक्ती आणि विरक्तीचं सोंग वठवलं, तर ते टिकत नाही. तेव्हा जिथं या दोन्ही गोष्टी सहजस्थितीच होतात तिथं पूर्णप्राप्ती दासीसारखी राबते, सेवा करीत राहते. म्हणजे काय? याचा अर्थ पटकन लक्षात येत नाही आणि त्यावर एवढंच सांगितलं की, भक्ताला जेव्हा जेव्हा जी जी गरज भासते ती ती  त्या त्या वेळी तात्काळ सहज भागवली जाते. वर हेदखील सांगितलं की ही गरज भौतिक गोष्टींची नसते. म्हणजे काय? तर असा भक्त सहजतेनं ‘सर्वज्ञ’ होतो. एक सत्पुरुष एकदा म्हणाले, ‘‘सर्वज्ञता म्हणजे काय? तर कुणी काही प्रश्न विचारला, तर त्याचं उत्तरही सहजतेनं अंतरंगातून प्रकट होणं. मग बाकी वेळी ज्ञानाचं ओझं कशाला वागवायचं? सदोदित ज्ञानाचं ओझं डोक्यात बाळगणं म्हणजे सर्वज्ञता नव्हे, तर ज्या वेळी जे ज्ञान सांगणं अपेक्षित आहे ते त्यावेळी प्रकट होणं, ही सर्वज्ञताच नाही का?’’ आणि ही सर्वज्ञता जो ज्ञानस्वरूप, आनंदस्वरूप परमात्म्याशी एकरूप झाला आहे त्याच्याच ठायी आढळते. उलट भक्ताची सर्वज्ञता सतत व्यापक होत असते. ‘ज्ञ’ म्हणजे जाणणं आणि ‘सर्वज्ञ’ म्हणजे सर्वकाही जाणणं! म्हणजेच अशा ‘सर्वज्ञ’ भक्ताला या सृष्टीत अज्ञात असं काहीच उरत नाही. जी जी गोष्ट त्याला जाणावीशी वाटते ती ती तात्काळ जाणिवेचा भाग होऊन जाते किंवा चराचरातील प्रत्येक गोष्टच त्याच्या जाणिवेचा भाग होऊन जाते, म्हणा ना! सर्वातला अंश असलेला तो मग सर्वच होऊन जातो, सर्वाशीच एकरूप होऊन जातो. त्याला अध्यात्म साधनेच्या मार्गाव्यतिरिक्त अन्यत्र असलेल्या कुणाही जीवमात्राबद्दल विशेष ममत्व उरत नाही की द्वेषभावही उरत नाही. सर्वाच्याच कल्याणाची सदिच्छा त्याच्या मनात नांदत असते. त्याच्याइतका सहृदय अन्य कुणी नसतो. त्याच्याइतका दुसऱ्याचं मन जाणणारा आणि त्याच्या खऱ्या परम हितासाठी त्याला आत्मकल्याणाच्या मार्गाची जाणीव करून देणारा दुसरा कुणी नसतो. मग त्याच्या मनात अपूर्णता अशी उरतच नाही. त्याच्या अंतरंगात विविध दिव्य प्रेमभाव उत्पन्न होत असतात आणि त्या प्रेमभावानं तो भगवंताशी सदैव एकरूप असतो. ज्या ज्या वेळी जो जो भाव उदित व्हायला हवा तो त्या वेळी सहजतेनं अंतरंगात उसळतो. याप्रकारे त्याची आंतरिक जडणघडणही  अतिशय भावसमृद्ध होत असते. कवि सांगतो, ‘‘यापरी भगवद्भक्ती। पूर्ण दाटुगी त्रिजगतीं। भक्तांघरीं नांदे प्राप्ती। भक्तिविरक्ति निजयोगें।।६०८।।’’ भगवंताची, परम तत्त्वाची, त्या परम तत्त्वाशी एकरूप अशा खऱ्या सद्गुरूची  भक्ती ही त्रिभुवनात श्रेष्ठ आहे तसेच या भक्ती आणि विरक्तीच्या ऐक्यामुळे या भक्ताच्या घरी म्हणजे हृदयात भावांची प्राप्ती टिकते!

 

Web Title: Loksatta ekatmyog ekatmyog article number
First published on: 09-08-2019 at 04:38 IST