जगाच्या विविध भागांत जातिव्यवस्थेचे केवळ अवशेष शिल्लक असताना, भारतात मात्र जातीय अस्मिता अधिकच ठळक का होऊ लागल्या आहेत, जातिव्यवस्थेच्या इतिहासाचा आपल्या वर्तमान आणि भविष्याशी संबंध काय.. या प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या अभ्यासग्रंथाविषयी..

प्रशांत रूपवते

Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?
savita prabhune on caste Discrimination in industry
“तुम्ही विशिष्ट आडनावाचे…”, भेदभावाबद्दल सविता प्रभुणे यांचं स्पष्ट मत; म्हणाल्या, “मला उलट या इंडस्ट्रीचा…”
regularly eating papaya on an empty stomach
Papaya Benefits : सकाळी उपाशी पोटी खा पपई , ॲसिडिटीचा त्रास होईल दूर; जाणून घ्या, आहारतज्ज्ञ काय सांगतात..
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

आपल्या जातव्यवस्थेला धार्मिक अधिष्ठान असले तरी स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर धर्मग्रंथांपेक्षा अधिक लेखन जात आणि जातव्यवस्था या विषयावर झाले आहे. ‘कास्ट सिस्टम इन इंडिया : ओरिजिन, इव्होल्यूशन, इन्फ्लुएन्स अँड फ्यूचर’ हा सुनील सांगळे लिखित ग्रंथ वरील दावा सिद्ध करतो. आपला दावा बळकट करण्यासाठी लेखकाने प्राच्यविद्या, वेद, पुराणे, स्मृती, उपनिषदांचे संदर्भ दिले आहेत. स्थानिक (अनेक दलित व्यक्तींची आत्मचरित्रे) राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि तेही संशोधनात्मक आणि शास्त्रीय संदर्भही यात आहेत. जात आणि जातव्यवस्थेसंदर्भात असलेले अनेक गैरसमज या ग्रंथाद्वारे दूर होतातच परंतु याबाबतच्या अनेक नव्या पैलूंची माहितीही अपणास होते. ग्रंथाचे संदर्भमूल्य मोठे आहे.

अनेकांचा असा समज आहे, की जातव्यवस्थेची मुळे मनुस्मृतीने रुजविली; परंतु प्रत्यक्षात तसे झालेले नाही. साधारण साडेतीन हजार वर्षांपूर्वीच्या ऋग्वेदातही जातींचा उल्लेख आहे. मनुस्मृतीचा काळ हा साधारणत: इसवीसन पूर्व १७०० ते २३०० वर्षे एवढा जुना आहे. पण त्यापूर्वी रचण्यात आलेल्या अनेक ग्रंथांचा गोषवारा सांगळे आपल्या पुस्तकात देतात. पाणिनी हा व्याकरणकार मनूच्या काही शतकांपूर्वी होऊन गेला. त्याचा काळ दोन हजार ४०० वर्षांपूर्वीचा आहे. त्यांच्या ग्रंथात चांडाळ, मृतप आदी जातींचा उल्लेख आहे. तर प्रा. नरहर कुरुंदकरांच्या मते गौतम धर्मसूत्रात म्हणजे दोन हजार ६०० वर्षे जुन्या ग्रंथात जातींचा उल्लेख आहे. दोन हजार ८०० वर्षे जुन्या बृहदकारण्यकोपनिषदामध्येही चांडाळ, पौलकस जातींचा संदर्भ आढळतो. त्याचप्रमाणे मनुस्मृतीपूर्वीच्या विष्णुस्मृती, आपस्तंब धर्मसूत्र, वशिष्ठ धर्मसूत्र, गौतम धर्मसूत्र, बृहस्पती स्मृती, नारदस्मृती आदींचे गरजेनुरूप संदर्भ या ग्रंथात दिले आहेत. तर मुख्य मुद्दा म्हणजे मनुस्मृतीच्या आधीही जात हा प्रकार आस्तित्वात होताच. मनूने मनुस्मृतीमध्ये या सर्वाचे संहितीकरण केले आहे.

जात आणि जातव्यवस्था या विषयावर इंग्रजी, मराठी आणि अन्य भारतीय भाषांतही अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. डॉ. श्री. व्यं. केतकर, वि. का. राजवाडे, डॉ. गो. स. घुर्ये, डॉ. इरावती कर्वे, डॉ. एम. एन. श्रीनिवासन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही पुस्तके आहेत. त्रिं. ना. आत्रे, प्रा. नरहर कुरुंदकर आदींची पुस्तकेही उल्लेखनीय आहेत. इंग्रज लेखकांमध्ये आर. ई. इंथोवेन, रसेल-हिरालाल, क्रूक, रिस्ले, केनडी आणि डॉ. जॉन विल्सन यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. ‘कास्ट सिस्टम इन इंडिया : ओरिजिन, इव्होल्यूशन, इन्फ्लुएन्स अँड फ्यूचर’ या ग्रंथात या सर्व, मराठी आणि इंग्रजी लेखकांच्या लेखनाचा समावेश आहे. ब्रिटिश अभ्यासक, प्रशासक यांनी या विषयावर केवळ लेखनच केले नाही, तर दर १० वर्षांनी जनगणना करून ती माहिती अद्ययावत करणारी व गॅझेाटियरमार्फत जिल्हावार अभ्यास उपलब्ध करून देणारी यंत्रणाही इंग्रजांनी विकसित केली. (देशात १९३१ मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारेच सामाजिक न्याय आरक्षण देण्यात आले.) विद्यार्थ्यांना शालेय व महाविद्यालयीन अभ्यासक्रमांद्वारे या विषयाची तोंडओळख करून देण्याचे महत्त्वही त्यांनी ओळखले. आज मात्र एनसीईआरटीच्या नव्या अभ्यासक्रमातून या संदर्भातील मजकूर वगळण्यात येत आहे. 

भारतीय जातिव्यवस्थेसारखे समाज जगात आणखी कोणत्या ठिकाणी होते, याचा ऊहापोहही या ग्रंथात करण्यात आला आहे. रोमन साम्राज्यात इसवी सनपूर्व ८०० ते इसवी सनपूर्व ४८७ पर्यंत पॅट्रिशिअन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शासकांचा काळ होता. या घराण्यातील सदस्यांना शहरातील ७४ हजार एकर क्षेत्र कसण्याचा अधिकार, राज्यकारभार चालविणाऱ्या सिनेटच्या सदस्यत्वाचा अधिकार वंशपरंपरेने मिळत असे. त्यांचा खासगी सेवक वर्ग होता. या वर्गाला खूप काळानंतर कूळ म्हणून जमीन कसण्याचा हक्क देण्यात आला. याव्यतिरिक्त जो तिसरा वर्ग होता तो प्लेबिअन म्हणून ओळखला जात असे. भारतात पूर्वी शूद्र म्हणून ओळखल्या जात असलेल्या वर्गाशी आणि आजच्या अन्य मागासवर्गाशी या प्लेबिअन वर्गाचे साधम्र्य होते. कारागीर असलेला हा समाज अशुद्ध मानला जात असे. त्यातील सदस्यांचा तिरस्कार केला जात असे. त्यांना शहरात राहण्याची, प्रशासकीय, न्यायव्यवस्थेत पदे भूषवण्याची परवानगी नव्हती. मात्र या जातसदृश्य व्यवस्थेचे तेथे इसवी सन २८७ पर्यंत समूळ उच्चाटन करण्यात आले. साधारण याच पद्धतीची व्यवस्था प्राचीन इजिप्त, चीन, जपान आदी देशांमध्ये होती. परंतु तिथे तिचे शेकडो वर्षांपूर्वीच उच्चाटन करण्यात आल्याचेही लेखक नोंदवतात. आपली जातव्यवस्था त्यांच्यापेक्षाही प्राचीन आहे आणि अद्याप टिकून आहे याचे कारण ती धर्माधिष्ठित आहे. इतरत्र या जातसदृश व्यवस्था धर्माधिष्ठित नव्हत्या त्यामुळे त्यांचे उच्चाटन करणे शक्य झाले.

विषमता, भेद वा जातसदृश व्यवस्था जगात अनेक ठिकाणी अस्तित्वात होती, मात्र तिथे तिचे शेकडो वर्षांपूर्वीच उच्चाटन झाले. असे असले तरीही, काही ठिकाणी या भेदभावाचे अवशेष आढळतात, मात्र त्यांचे स्वरूप ‘क्राइम विदाऊट व्हिक्टीम’ अशा स्वरूपाचे आहे. वर्णभेद हे त्याचे चांगले उदाहरण आहे.

जगात सद्य:स्थितीत कोणताही देश वा संस्कृती या भेदाधारित व्यवस्थेचे समर्थन करत नाही. भारतात मात्र आजही या व्यवस्थेचे जाहीर समर्थन केले जाते. एवढेच नव्हे, तर ती मिरवलीही जाते. गुजरात विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी गांधीनगर येथे २८ एप्रिल २०१८ रोजी ब्राह्मण व्यापार परिषदेत म्हटले, ‘चंद्रगुप्त मौर्य, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना घडविण्यात ब्राह्मणांचे योगदान आहे. श्रीराम हे क्षत्रिय होते, त्यांना ब्राह्मण ऋषींनीच देवत्व बहाल केले. श्रीकृष्ण गोकुळचे ग्वाल- गवळी म्हणजे ओबीसी समाजाचे होते. त्यांना देवत्व देण्यात संदीपान या ब्राह्मण ऋषीचे योगदान होते. त्याचप्रमाणे वाल्मीकी हे आदिवासी तर व्यास हे कोळीपुत्र होते. या दोघांनाही ब्राह्मणांनी मोठे केले.’ हे झाले देवतांच्या बाबतीत. महापुरुषांच्या बाबतही या संस्कृतीचे म्हणणे फार वेगळे नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज ही नावे वानगीदाखल पुरेशी आहेत.

‘कास्ट सिस्टम इन इंडिया’ या ग्रंथात अनेक जातींबद्दल विस्तृत विवेचन करण्यात आले आहे. ब्राह्मण, मराठा, कायस्थ, सोनार, तेली, माळी, वंजारी, महार, चांभार, मातंग, बुरुड, कैकाडी अशा ५०हून अधिक जातींचा त्यात समावेश आहे. कायस्थ, वंजारी, महार या समाजांसंदर्भातील माहिती अतिशय रसपूर्ण आहे. त्यातून वर्तमानकाळातील अनेक घडामोडींची उकल होते. विस्तारभयामुळे सर्व जातींचा धांडोळा घेणे शक्य नाही. वानगीदाखल कायस्थ जातीचा संक्षिप्त आढावा घेऊ या. कायस्थ ही जात सुरुवातीपासून कर्मठ, निष्ठुर, अमानवी जातव्यवस्था पाळण्यात फार उत्सुक नसल्याचे सर्व धर्मग्रंथांतून दिसते. याचे अनेक पुरावे ग्रंथात आहेत. म्हणजे कायस्थांना अस्पृश्यांच्या हातचे अन्न नाही, तरी पाणी चालत असे. अस्पृश्यांबरोबरचे त्यांचे व्यवहार इतरांच्या तुलनेत खूपच मानवी पातळीवर होते, असे ग्रंथातील माहितीवरून दिसते. थोडक्यात मानवी मूल्ये असलेली आणि तुलनेने आधुनिक जात. मग आपणास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उच्चवर्णीय सहकाऱ्यांत बहुसंख्य कायस्थ का याचा उलगडा होतो. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास येथील ब्राह्मणांनी नकार दिल्यानंतर काशीवरून गागाभट्ट या ब्राह्मणाची व्यवस्था करणारे, शिवाजीराजे शूद्र नाहीत तर क्षत्रिय आहेत, सिसोदिया घराण्याचे वंशज आहेत, हे सिद्ध करणारी कागदपत्रे आणणारेही कायस्थच होते. ती परंपरा अगदी प्रबोधनकार ठाकरे, टिपणीस, चिटणीस, चित्रे ते अ‍ॅड. सुनील दिघे यांच्यापर्यंत कायम राहिलेली दिसते.

पश्चिम बंगाल हा ‘आर्यवर्ता’चे वा कथित हिंदूस्थानाचे शेवटचे टोक. त्याच्या वरचा सर्व भाग बिमारू  राज्ये वा गायपट्टा म्हणून ओळखला जातो. या भागात सर्वात कर्मठ वैदिक संस्कृतीचा प्रभाव आहे. त्यामुळे जातव्यवस्थेची मुळे घट्ट आहेत. दलित अत्याचाराचे, अमानवी शोषणाचे प्रमाण प्रचंड आहे. परंतु आर्यवर्तात येऊनही पश्चिम बंगालमध्ये वैदिक संस्कृतीचा प्रभाव कमी आहे, दलित अत्याचारांच्या घटना कमी आहेत. परिणामी दलित चळवळही फारशी प्रभावी नाही. त्याला कारण म्हणजे या प्रदेशावर कायस्थांचा प्रभाव आहे. हा कायस्थ प्रभाव तिथे साहित्य, कला, संगीत, नृत्य, चित्रपटांवर दिसतो.

भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात मराठीत ‘राजा हरिशचंद्र’ या चित्रपटाद्वारे झाली असे कागदोपत्री मानण्यात येते. परंतु त्याआधी बंगालीत चित्रपटनिर्मिती झाली होती, मात्र तांत्रिक कारणांमुळे तो चित्रपट मराठी चित्रपटानंतर काही दिवसांनी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे नाव आहे, ‘अच्छूत कन्या’! अशा अनेक अन्य रोचक संदर्भाची उकल यातून होते. स्वामी विवेकानंद यांच्यासारखे बुद्धिप्रामाण्यवादी विद्वान (हेही कायस्थ) जातव्यवस्था वा धर्मातर यावर सम्यक भाष्य करू शकले ते या बुरसटलेल्या विचारांचे पाईक नसल्यामुळेच. अशा अनेक गोष्टींची उकल या ग्रंथातील शास्त्रपूर्ण, संशोधनात्मक माहितीद्वारे होते. त्यामुळे या विषयाचे अभ्यासक, अध्यापक, विद्यार्थी आणि भूत- वर्तमान व भविष्याला जोडणाऱ्या सूत्राचा शोध घेऊ पाहणाऱ्यांसाठी हा ग्रंथ उत्तम संदर्भसाहित्य ठरेल. सामाजिक, आर्थिक, राजकीय घडामोडींच्या, जातव्यवस्थेने लपवून ठेवलेल्या वस्तुस्थितीची माहिती करून घेण्यासाठी आणि या सर्वाची उकल करण्यासाठी संग्रही ठेवावा असा हा ग्रंथ आहे.

लेखकाने जात आणि जातिव्यवस्थेचे भविष्य यावर ठोस भाष्य केले नसले तरी, आपण त्याचा अदमास घेऊ शकतो. कारण, आपण जातव्यवस्थेचे उच्चाटन करू म्हटले तर ती धर्माधिष्ठित असल्याने धर्माचे उच्चाटन केल्यासारखे होईल! त्यामुळ हा  पेच वाढतो.  उच्चाटन  कसे करायचे याचे उत्तर काळच देईल.