महाराष्ट्राची ‘लोकवाहिनी’ असलेल्या एसटीशी (राज्य परिवहन महामंडळ) प्रवासाच्या निमित्ताने कुणाचा संबंध आला नाही अशी व्यक्ती महाराष्ट्रात भेटणे विरळच…!

प्रस्तुत लेखकाचा जन्म आणि शिक्षण मुंबईत झाले असले तरी, पश्चिम महाराष्ट्रातील बागायती पट्ट्यात मूळगाव असल्याने आईच्या पोटात असल्यापासूनच सातत्याने प्रवासाच्या निमित्ताने एसटीशी संबंध येत गेला… दरम्यान या दीर्घ काळात, एसटीची अनेक बदलती रुपे प्रस्तुत लेखकाने पाहिली… अनुभवली! तसेच यामुळे एसटी महामंडळातील अनेक अधिकारी, कर्मचारी त्यातही विशेषतः चालक-वाहक यांच्याशी वैयक्तिक परिचय वाढला! आणि यामुळेच एसटीच्या काही समस्या आणि प्रश्नांची जवळून ओळख झाली.

Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
police maharashtra
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी पोलीस कर्मचारी ‘घरगडी’! राज्यभरात तीन हजारांवर पोलीस…
Upsc Preparation Legislature Judiciary in Indian Polity Paper of Civil Services Pre Exam
upsc ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था; कायदेमंडळ, न्यायमंडळ, पंचायती राज

जानेवारी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात, एसटी महामंडळातील कामगार संघटना (युनियन) एसटी कामगारांकडून ‘कामगार संघटना निधी‘ (थोडक्यात युनियन वर्गणी) गोळा करतात! एसटी महामंडळातील कामगार संघटनांचा हा ‘पावत्या फाडण्याचा कार्यक्रम’, दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागताला जानेवारी महिन्यात ठरलेला असतो! आजच्या घडीला एसटीमध्ये अंदाजे २० ते २५ कामगार संघटना (युनियन) आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष- संघटना गणिक या युनियन वेगवेगळ्या! (यातील मान्यताप्राप्त किती हा संशोधनाचा विषय!) एसटी महामंडळातील प्रत्येक कामगारांकडून साधारणपणे १००-२०० रुपये गोळा केले जातात (पावत्या फाडल्या जातात)! ‘एसटीचा कामगार, चालक-वाहक हा ज्या युनियनशी बांधील, त्या युनियनच्या नावे पावती फाडतो! पण आज एसटी महामंडळातील या डझनवारी कामगार संघटनांचा प्रभाव कितपत टिकून आहे, यासंदर्भात एसटीचे कामगार, चालक-वाहक खासगीत नकारार्थी उत्तर देतात! एसटी महामंडळातील कामगार संघटनांची एसटी कामगारांच्या मनावरील पकड केव्हाच सैल झाली आहे, हे, २०२१ या वर्षाच्या उत्तरार्धातच दिसून आले. त्यावेळी एसटी महामंडळातील कामगारांनी, एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरणासाठी दीर्घकाळ संप पुकारला होता. त्यावेळी एसटी कामगार, चालक-वाहक यांनी एसटीतील कामगार संघटनांचे नेतृत्व आणि बंधन झुगारून देत, एसटी कामगार अन् संघटना याच्याशी सुतराम संबंध नसलेल्या एका बाहेरील व्यक्तीवर (अंध)विश्वास व्यक्त केला आणि या ‘नव-नेत्तृत्वा’खाली एसटी कामगार, चालक-वाहक यांनी आपला एसटी महामंडळ ‘विलिनीकरणा’चा दीर्घ लढा सुरू ठेवला! या विलिनीकरण लढ्यास भरपूर प्रसिद्धी मिळाली. पण या विलिनीकरण आंदोलनाचे अखेरीस काय झाले, हे सगळ्यांनी पाहिले. आज राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) मधील यंत्र विभागातील कर्मचारी, चालक-वाहक यांच्या मनात एसटी कामगार संघटना आणि त्यांचे नेतृत्व याविषयी नाराजीची भावना तीव्र आहे.

हेही वाचा – लोक आपले म्हणणे रामावर लादल्याशिवाय राहणार नाहीत!

आज एसटीमधील चालक-वाहक हा प्रामुख्याने समाजातील निम्न आर्थिक स्तरातील ग्रामीण भागातील अल्पभूधारक किंवा भूमीहीन बहुजन वर्गातून येतो. त्याचा एक रास्त प्रश्न आहे. देशातील इतर शासकीय, निम्न शासकीय क्षेत्रात किंवा कोणत्याही खासगी आस्थापनेत इतक्या डझनवारी कामगार संघटना नाहीत! मग एसटी महामंडळात इतक्या कामगार संघटना कशासाठी? इतक्या डझनवारी कामगार संघटना असण्यासही हरकत नाही! पण राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७५ वर्षांच्या इतिहासात या कामगार संघटनांनी एसटी कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक हितासाठी- उन्नतीसाठी काय प्रयत्न केले?

आज एसटी महामंडळ शासनाच्या सार्वजनिक वाहतूक उपक्रमाचा एक भाग आहे आणि शासनाच्या आर्थिक मदतीवर अवलंबून आहे. परंतु आज मागील दाराने सेवेचे कंत्राटीकरण अन् खासगीकरण सुरू आहे. याबाबत कामगार संघटना गप्प आहेत. उदाहरणार्थ, खासगी कंत्राटदारांच्या बस भाडेतत्त्वावर घेऊन चालवल्या जात आहेत! आजही एसटी महामंडळातील २०१६-२०२० वर्षादरम्यानचा कामगार करार पूर्णत्वास गेला नाही! या करारातील १ % वार्षिक वेतनवाढ आणि ३ % घरभाडे भत्ता याची थकबाकी एसटी कामगारांना मिळालेली नाही! मग २०२०-२०२४ वर्षाचा कामगार करार तर अजून दूरच आहे. तसेच एप्रिल २०१६ पासून महागाई भत्त्याची थकबाकी थकीत आहे. या बद्दल एसटी महामंडळातील कामगार संघटना काय करतात, हा एसटी कामगार, चालक-वाहक यांचा प्रश्न आहे.

कोवीड १९ या साथजन्य आजारात लागू केलेल्या टाळेबंदीत, ज्या चालक-वाहकांनी जोखीम पत्करून कर्तव्यावर रुजू होत सेवा बजावली, त्यांना त्या नोव्हेंबर-डिसेंबर २०२० या काळातील विशेष भत्ता अजूनही मिळालेला नाही. नोव्हेंबर २०२१ ते एप्रिल २०२२ या विलिनीकरण आंदोलन काळातील वेतनावर कामगार चालक-वाहक यांनी केव्हाच पाणी सोडले आहे. पण या संप काळात एसटी कामगारांची वार्षिक वेतनवाढ ६ महिने पुढे गेली. तसेच या आंदोलन काळात सेवेचे २४० दिवस न भरल्याने काही एसटी कामगारांची लिपिकपदी पदोन्नती रखडली! याबाबत एसटी कामगार संघटनांची भूमिका काय आहे?

आजही, एसटी महामंडळातील कामगार, चालक-वाहक यांना वेतनासाठी दर महिन्याच्या ७ तारखेऐवजी १२, १५ किंवा २० तारखेची वाट पहावी लागते. आजही ‘राज्य परिवहन महामंडळा’च्या मोठ्या तसेच छोट्या शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत. काही मोकळ्या आहेत तर काही वापरात आहेत. त्या खासगी विकासकांच्या ताब्यात जाण्यापासून रोखण्यासाठी, एसटीतील कामगार संघटना आणि त्यांचे पदाधिकारी काय भूमिका घेतात? तसेच आगार पातळीवर किंवा ग्रामीण भागात मुक्कामी ठिकाणी चालक-वाहक यांना किमान मूलभूत सुविधा व्यवस्थित उपलब्ध व्हाव्यात (जसं की पिण्याचे पाणी, स्नानगृह, शौचालय वगैरे) यासाठी एसटी कामगार संघटना काय करतात? आगारातील चालक-वाहक विश्रांती कक्षाची अवस्था सुधारण्यासाठी एसटी कामगार संघटना लक्ष देतात का? विशेषतः महिला कामगार, चालक-वाहक यांची यामुळे मुक्कामी ठिकाणी होणारी कुचंबणा कामगार संघटनांच्या लक्षात येत नाही का? याबाबत एसटी कामगार संघटना, एसटी महामंडळ प्रशासनाशी संघर्षाची भूमिका का घेत नाहीत?

हेही वाचा – गरिबी कोणी कमी केली? ‘यूपीए’ने की भाजपने?

राज्य आणि केंद्र सरकारच्या कामगार विरोधी कायद्यांबाबत तर एसटी कामगार संघटनांची मवाळ भूमिका आहे! आजही एसटी महामंडळातील चालक-वाहक यांना आरोग्य किंवा अपघात विमा नाही! चालक-वाहक यांना ५३ रुपये प्रति महिना आरोग्यासाठी दिले जातात, असा महामंडळातील चालक-वाहकांचा दावा आहे! कर्तव्यावर असताना एसटी चालक-वाहक यांच्याकडून अपघात झाला तर, एसटी महामंडळ संबंधित चालक- वाहकाची बाजू न्यायालयात मांडत नाही! थोडक्यात संबंधित चालक-वाहक यांना बाजू मांडण्यासाठी, एसटी महामंडळ वकील देत नाही तर स्वतः चालक-वाहक यांना वकील द्यावा लागतो. याबाबतही कामगार संघटना चालक वाहक यांच्या बाजूने उभ्या राहिलेल्या दिसत नाहीत!

राज्य परिवहन महामंडळा (एसटी) साठी चालक-वाहक महत्त्वाचा आहे. प्रवाशांना इच्छित स्थळी सुरक्षित पोहोचवणे हे जसे त्याचे कर्तव्य आहे तसेच ‘राज्य परिवहन महामंडळा‘चा आर्थिक तारू या चालक-वाहकांच्या हातात आहे. त्यांच्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे, एसटी महामंडळातील कामगार संघटना दुर्लक्ष करणार असतील तर त्यांनीही एसटी महामंडळातील डझनवारी कामगार संघटनांचा वार्षिक वर्गणीचा आर्थिक भार का व्हावा, हा प्रश्न रास्त आहे!

padmakarkgs@gmail.com