भारतीय दर्शन परंपरेत, दर्शनांची आपला सिद्धांत मांडण्याची एक रीत आहे. स्वत:चा पक्ष मांडताना आपल्या विरोधी विचारांचे आदरपूर्वक खंडन केले जाते. विरोधक म्हणून आस्तिक दर्शनांसमोर सांख्य दर्शन (निरीश्वर) उभे आहे. त्याला ‘प्रधान मल्ल’ म्हटले जाते. विनोबांनी साम्ययोग विकसित करताना ही पद्धती आणखी पुढे नेली. ‘साम्यवाद की साम्ययोग’ या त्यांच्या लेखसंग्रहातील ‘साम्ययोगाचे समग्र दर्शन’ या लेखात त्यांनी साम्ययोगाचे सामाजिक आणि राजकीय अंग स्पष्ट केले आहे. ‘‘भूदान यज्ञा’च्या मागे जो विचार आहे त्याचे नाव मी साम्ययोग ठेवले आहे. याच साम्ययोगाच्या आधारावर आम्ही सर्वोदय-समाज निर्माण करू इच्छितो. सर्वोदय समाजाच्या बाबतीत आपणाला हे माहीत आहे की तो बहुसंख्यांचे नव्हे तर सर्व समाजाचे हित इच्छितो. ज्या साम्ययोगाच्या आधारावर हा विचार उभा आहे तो मी अधिक विस्ताराने विशद करू इच्छितो. आज जगात तीन विचारसरणी प्रचलित आहेत, हे आपणास माहीत आहे. एक जुना-पुराणा भांडवलवाद आहे. क्षमता वाढविण्याचा आमचा हेतू आहे, असे भांडवलवाद म्हणतो. दुसरा लोकशाही समाजवाद व तिसरा साम्यवाद. सर्वाच्या जीवनविषयक गरजांची पूर्ती आम्ही समभावाने करू असा साम्यवादाचा दावा आहे.’’ राजकीय विचारप्रणालींचे विनोबांचे आकलन आपण जाणून घेणार आहोत, तत्पूर्वी विनोबांच्या अध्ययन पद्धतीचे स्मरण असणे गरजेचे आहे. पारंपरिक असो की आधुनिक कोणताही विषय विनोबा एका वेगळय़ा अंगाने पाहतात. दोन्ही परंपरांची अभ्यासाची एक रीत आहे. तिचे म्हणून महत्त्व आहेच. विनोबाही ती रीत जाणतात. तथापि आपला विचार सहजपणे लोकांसमोर ठेवता आला पाहिजे. लोकांच्या सहभागातून त्यावर प्रयोग करता आला पाहिजे आणि प्रयोगाच्या निष्कर्षांनुसार पुन्हा चिंतन सुरू झाले पाहिजे, अशी ही विचारसरणी आहे. त्यांचे चिंतन ‘सिद्धांत’ आणि ‘कृतांत’ या दोहोंचा मागोवा घेणारे आहे. विनोबांची ही विचारसरणी ध्यानात आली नाही तर त्यांनी लावलेला गीतार्थही चुकीचा ठरवता येतो. राजकीय आणि सामाजिक विषयांची त्यांना समजच नव्हती असेही म्हणता येते. समन्वयाचे त्यांचे प्रयत्न भाबडेपणा या गटात ठेवता येतात. इथेच एक मुद्दा समोर येतो. भांडवलशाही, लोकशाही समाजवाद आणि साम्यवाद यांचे आजवरच्या कामगिरीचे मूल्यमापन सुरू केले आणि त्याला पारंपरिक धर्मचिंतनाच्या समीक्षेची जोड दिली तर हाती कोणते निष्कर्ष येतात? या उलट सर्वोदय विचार किंवा गांधी विनोबांचे मानवी समाजाच्या भवितव्याचे चिंतन आपल्यासमोर कोणते चित्र ठेवते, हे प्रश्न अटळ आहेत. दुसरीकडे ज्या विचारसरणी साम्ययोग नाकारतो त्यांच्या विषयी त्याची भूमिका काय आहे? उदाहरणार्थ साम्यवाद. ‘करुणा आणि साम्य या पायावर साम्यवाद उभा आहे. ही मूल्ये आपण नाकारली की साम्यवादाची प्रतिष्ठा वाढली.’ अगदी नाझी आणि फॅसिस्ट विचारसरणी का प्रतिष्ठित झाल्या याचाही ते शोध घेतात. आपल्या तत्त्वज्ञानाने सांख्य दर्शनाचे महत्त्व मान्य करून त्याला प्रधान मल्लाचे स्थान दिले आहे. साम्ययोगही आपल्या समोरच्या ‘मल्लत्रयी’चा गंभीरपणे विचार करतो. - अतुल सुलाखे jayjagat24 @gmail.com