सुरभी स्नॅक्सद आपल्या देशात जागोजागी विविध पदार्थ खायला, पाहायला मिळतात. मात्र एकच पदार्थ देशातील बहुतेक भागांत पाहायला मिळणे आणि तोही तितकाच लोकप्रिय असणे दुर्लभ असते. लाडवाच्या आकाराचा गोलाकार ‘कचोरी’ हा उत्तरप्रदेश किंवा राजस्थान या भागात जन्माला आलेला पदार्थ सर्वत्र आढळतो. चेंडूसारखी दिसणारी ही मैद्याची कचोरी मुख्यत: उडीद डाळ/मुग डाळ, बेसन, मिरपूड, लाल तिखट, मीठ व अन्य मसाल्यांच्या मिश्रणातून तयार झाली. पुढे देशातील विविध भागांत हा पदार्थ त्या त्या प्रांतानुसार बदलत गेला. राजस्थानात ‘कुछ मिठा हो जाए’ असं म्हणत साखरपाकाने तोंड रसाळ करणारी मावा कचोरी तर दुसरीकडे कांद्याने जिभेचे चोचले पुरवणारी ‘प्याज कचोरी’ खवय्यांना खुणावत असतात. चाटच्या रूपातील खास्ता कचोरी/राज कचोरीने दिल्लीकरांना भुरळ घातली तर खाद्यसंस्कृतीने नटलेल्या महाराष्ट्रात शेगांव कचोरी या नावाने तिने एक वेगळे रूप घेतले. सगळीकडे प्रसिद्ध झालेल्या या कचोरीने खवय्यांना उपवासाच्या दिवशीही कचोरी खाण्यास प्रवृत्त केले. याच कल्पनेने कल्याण पश्चिम येथील टिळक चौकात सुरभी स्नॅक्स येथे उपवासाच्या नारळाच्या कचोरीची कल्पना उदयाला आली. कल्याण व अन्य भागांतून खवय्ये येथेही उपवासाची कचोरी खाण्यासाठी गर्दी करतात. बटाटय़ाचे आवरण व शेंगदाणे, कोथिंबीर, मिरची-आले व जिऱ्याची फोडणी यांचे मिश्रित सारण असलेली जन्याकाकांकडची उपवासाची कचोरी ही भलतीच लोकप्रिय आहे. गरमागरम तळलेली ही कचोरी व स्पेशल डिमांड असलेली आंबट, गोड हिरवी चटणी हे येथील खवय्यांचे कॉम्बिनेशन. टिळक चौकातील हे सुरभी स्नॅक्स जन्याकाका यांच्या नावानेच प्रसिद्ध आहे. नारळाच्या कचोरी इतकीच येथील वाटाण्याची पुणेरी मिसळ व मटकीची झणझणीत कोल्हापुरी मिसळ प्रसिद्ध आहे. सुरभी स्नॅक्समध्ये आठवडय़ातील वारांप्रमाणे खाद्यपदार्थ मिळतात. सोमवार, गुरुवार व शनिवार सकाळ-संध्याकाळ वाटाण्याची पुणेरी मिसळ तर मंगळवार व शुक्रवार सकाळी मटकीची झणझणीत कोल्हापुरी मिसळ आणि संध्याकाळी उपवासाची नारळाची कचोरी मिळते. नॉन व्हेज खाणाऱ्या खवय्यांसाठी सकाळी कोंबडी वडय़ांचा (तांदूळ वडे)चा स्पेशल बेत असतो. याशिवाय पोहे, उपमा, वडा-पाव या पदार्थाची रेलचेल असते.समीर पाटणकरस्थळ- सुरभी स्नॅक्स, संबोध बिल्डिंग (जुना मदन वाडा), टिळक चौक, कल्याण (प.).वेळ : सकाळी- ०८.३० ते दुपारी १२.००दुपारी ०४.३० ते रात्री ०८.००कल्याणची ओळखकल्याण हे शहर ऐतिहासिक गोष्टींबरोबरच खाद्यसंस्कृतीनेही नटलेले आहे. पारंपरिक मिसळ, पोहे, उपमा हे पदार्थ छोटय़ा गाडीवर विकून आई-वडिलांनी सुरू केलेला व्यवसाय आता जन्या काकांनी खूप मोठा करून ठेवलाय. मिसळ, उपवासाच्या नारळाच्या कचोरीसारख्या दर्जेदार व वेगळ्या पदार्थामार्फत त्यांनी आपली ओळख कल्याण व अन्य परिसरात निर्माण केली आहे.