ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीत एका कपड्याच्या फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना सोमवारी सकाळी घडल्याचे वृत्त आहे. या घटनेची वर्दी मिळताच अग्निशामक दलाचे तीन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर ही आग विझवण्याचे काम सुरु आहे. या आगीत किती नुकसान झाले याबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

सरवली एमआयडीसीतल्या उजागर डाईंग या फॅक्टरीला ही भीषण आग लागली आहे. या आगीत १२ ते १३ डाईंग जाळून खाक झाले आहेत. ही आग विझविण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले असून भिवंडी, कल्याण, एमआयडीसी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मुंबई आणि परिसरात गेल्या पंधरवड्यात अनेक ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. चेंबूरच्या टिळकनगर भागात चार दिवसांपूर्वी रहिवासी इमारतीला आग लागली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या शुक्रवारी भिवंडी शहरातही एका भंगार गोदामामध्ये भीषण आग लागली होती. या आगीमध्ये गोदामाच्या शेजारी असलेले दुकान आणि एक दुचाकी सुद्धा जळून खाक झाली होती. आगीत गोदामही जळून खाक झाली होती.