घाऊक बाजारात दरांत घट, किरकोळ बाजारात मात्र ग्राहकांची लूट कांद्याचे दर गगनाला भिडल्याने गेल्या काही दिवसांपासून त्रासलेल्या ग्राहकांना सध्या कर्नाटकच्या हुबळी कांद्याच्या आगमनामुळे दिलासा मिळाला आहे. हुबळी कांद्याची आवक सुरू झाल्याने वाशी आणि कल्याणच्या घाऊक बाजारात दर काही प्रमाणात स्थिरावले आहेत. परंतु ग्राहक जुन्याच कांद्यांना पसंती देत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात जुना कांदा आजही ८० रुपये किलो इतक्या चढय़ा दराने विकला जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कल्याण आणि वाशी येथील घाऊक बाजारात होणारी आवक गेल्या महिन्यापासून कमालीची रोडावल्याने कांद्याचे दर किलोमागे २५ ते ३० रुपयांनी वाढले आहेत. घाऊक बाजारात झालेल्या दरवाढीमुळे किरकोळ बाजारात ६० ते ८० रुपये किलो या दराने कांदा विकला जात आहे. नाशिक जिल्ह्य़ात अवेळी झालेल्या पावसाने कांद्यांच्या किमती एकाएकी वाढल्या. याचा परिणाम महाराष्ट्रासह देशभरात पाहायला मिळत आहे. कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळय़ांत पाणी आणले असतानाच कल्याणच्या घाऊक बाजारात कर्नाटकचा हुबळी कांदा दाखल झाला आहे. या कांद्याचे भाव घाऊक बाजारपेठेत ४० ते ४५ रुपये किलो असे आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील व्यापारी हे कल्याण, वाशी व ओतूर येथून कांदा आणतात. ओतूर येथील शेतातून आणलेला थेट कांदा हा ५५ ते ५८ रुपये किलोने मिळत आहे. गावाहून थेट कांदा आणणे आणि कल्याणच्या बाजार समितीतून कांदा आणणे यामधील दरांमध्ये २० ते ३० टक्क्यांची तफावत असल्याने व्यापारी ओतूरहून थेट कांदा आणणे पसंत करीत आहेत. कल्याणच्या बाजारातून कांदा खरेदी केला जातो, मात्र त्यात व्यापाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत. हुबळी कांदा हा नवा असल्याने त्याची चव थोडी वेगळी लागते. तसेच दर्जाही कमी असल्याने या कांद्यांना जास्त मागणी नाही. तसेच यंदा पाऊस कमी झाल्याने कांद्याचे रोप लावताना शेतकरी विचार करतील, त्यामुळे नवा कांदा किती प्रमाणात बाजारात उपलब्ध होईल यावर त्याचे भाव ठरतील, असे व्यापारी शिवाजी काचन यांनी सांगितले. रसायनविरहित कांदा इतर कांद्यापेक्षा केमिकलविरहीत कांदा हा १०० रुपये किलोने बाजारात दाखल झाला आहे. हे पीक इतर पिकांपेक्षा वेगळे असून यात केवळ सेंद्रिय खताचा वापर केला जातो. यामुळे कांद्याला काजळी पकडत नाही तसेच कांद्याचे सालही सहजासहजी निघत नाही. ओतूरच्या बाजारातून हा कांदा थेट शेतकऱ्यांकडून विकत घेतला जातो. इतर पिकांपेक्षा याचे उत्पन्न कमी असल्याने त्याच्या किमती जास्त आहेत. ठरावीक शेतकरीच हे पीक घेत असल्याने ग्राहकांना तो फार कमी प्रमाणात उपलब्ध होतो. किमती जास्त असल्या तरी काही ग्राहक हाच कांदा खरेदी करीत असल्याचे काचन यांनी सांगितले.