मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसेकडून २२ तारखेला ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन मनसेकडून करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे याच दिवशी मनसेकडून ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे. यासंबंधी बोलताना मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलं आहे की, "मुळात हा विषय ईडीचा नसून ईव्हीएमचा आहे. १५ वर्ष ईडीला का नाही कळलं ? राज ठाकरे ज्याप्रकारे ईव्हीएमविरोधात आंदोलन करत आहेत याचा सरकारला त्रास होत आहे. हा सगळा दबावतंत्रांचा भाग आहे". "जर राज ठाकरेंना खरंच बोलावलं गेलं तर महाराष्ट्रभर किंबहुना मुंबईत जे काही होईल त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल", असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. राज ठाकरेंच्या पाठी त्यांचा कार्यकर्ता खंबीरपणे उभा आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. दरम्यान मनसे नेते अभिजीत पानसे यांनी हा गळचेपीचा प्रकार असून महाराष्ट्राचा गुजरात व्हायला वेळ लागणार नाही असं सांगत महाराष्ट्राने राज ठाकरेंच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं म्हटलं आहे.