भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भिवंडीतल्या उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेली आयसीयू प्रकल्पाचा ऑनलाइन शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला. अति दक्षता विभागात दाखल असलेल्या करोनाच्या गंभीर रुग्णांसाठी विशेष तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि उपचाराची सेवा या तंत्रज्ञानाच्या मदतीने घेण्यात येणार आहे. अकोला, जळगाव, सोलापूर, जालना आणि औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालं आणि जिल्हा रुग्णालयांमध्येही ही सुविधा सुरु केली जाणार आहे. करोनामुळे होणारा मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी टेली आयसीयू सेवा फायदेशीर ठरेल असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला.

मेडीस्केप इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उत्तर दायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून प्रायोगिक तत्वावर ही सुविधा काही महिने देण्यात येणार आहे. भिवंडी येथील आयजीएम उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून दिल्ली येथील गंभीर रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाते आणि त्यांना कुठले उपचार द्यायचे या मार्गदर्शन केले जाते.

दिवसातून पाच वेळा या विशेष तज्ज्ञांकडून रुग्णांची विचारपूस केली जाते. राज्यात अन्य ठिकाणी करण्यात येणारी ही सुविधा वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात आहे मात्र भिवंडी त्याला अपवाद ठरले असून ही सुविधा असणारे ते राज्यातील पहिले उपजिल्हा रुग्णालय ठरले आहे. येथील टेलीआयसीयू कक्ष आरोग्यमंत्री यांच्या दिवंगत मातोश्री शारदाताई यांना समर्पित करण्यात आल्याचे मेडीस्केप फाउंडेशनतर्फे सांगण्यात आले.

यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, आरोग्य सुविधेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ही चिंतेची बाब असून मृत्यूदर एक टक्क्यांपेक्षाही कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.