२५ वर्षांपासूनचा उपक्रम; प्रत्येक शाळेला सहा वेळा भेट मुरबाड, शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रयोगशाळा नसल्याने येथील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील विज्ञान प्रयोग केवळ पुस्तकातून शिकता येत होते. त्यांना प्रत्यक्षात प्रयोग करून त्याचे अनुमान लिहिता यावे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांताच्या वतीने फिरत्या प्रयोगशाळेचा उपक्रम राबविण्यात आला. गेली २५ वर्षे हा उपक्रम सुरूअसून नुकताच या प्रकल्पात नवीन वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. १९७३ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समितीची स्थापना झाली. नैसर्गिक आपत्ती काळात संघामार्फत आपत्ती विमोचन समिती असावी या हेतूने या समितीची स्थापना करण्यात आली होती. सुरुवातीला या समितीचे कार्य अस्थायी स्वरूपात सुरू होते. १९८९ मध्ये डॉ. हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने समितीने स्थायी स्वरूपात काम करावे असे सुचले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांतची स्थापना करून शिक्षण, संस्कार, आरोग्य, स्वावलंबन, कृषी व आपत्ती व्यवस्थापन या सहा प्रमुख आयामांवर काम करण्यास संस्थेने सुरुवात केली. ठाणे जिल्ह्य़ातील प्रभाकर पंत दांडेकर, हरिभाऊ बापट, जयंतराव कुलकर्णी यांनी वनवासी भागात काम करण्यास सुरुवात केली त्यातून फिरती विज्ञान प्रयोगशाळा ही संकल्पना पुढे आली. त्यांचे कार्य भैय्याजी ऊर्फ सुरेश जोशी यांनी पुढे चालू ठेवले. सुरुवातीला भिवंडी, कल्याण ग्रामीण या भागात एका रिक्षात ही शाळा सुरूकरण्यात आली. रिक्षाचालक व एक शिक्षक असे या शाळेचे स्वरूप होते. त्यानंतर १९९१ मध्ये शहापूर व मुरबाड तालुक्यातील शाळांत जीप हे वाहन खरेदी करून ही शाळा सुरूकरण्यात आली. श्रीरंग पिंपळीकर हे प्रमुख शिक्षक त्या वेळी होते. २५ जिल्हा परिषदेच्या शाळांतील सुमारे दोन ते तीन हजार विद्यार्थी या शाळेचा सुरुवातीला लाभ घेत होते. आता ५० जिल्हा परिषदेच्या शाळेतील पाच हजार विद्यार्थी या शाळेचा लाभ घेत आहेत. गणेश पवार व प्रकाश ठाकरे हे शिक्षक, गणपत पोंडेकर वाहनचालक हे विद्यार्थ्यांना आता प्रयोग शिकविण्याचे काम करतात. ग्रामीण भागातील प्रत्येक प्राथमिक शाळेत प्रयोगशाळा असेलच असे नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा अभ्यास केला आणि जेथे जेथे आवश्यकता आहे तेथे ही शाळा सुरू करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, विज्ञानातील क्लिष्ट प्रयोग सोपे करून विद्यार्थ्यांना सांगता येणे सोपे झाले. या शाळेचे कार्य पुढे कार्यरत ठेवण्यासाठी १०० माजी विद्यार्थ्यांचा संच मदत करत आहे. शाळांचे एक वेळापत्रक तयार करण्यात आले असून वर्षभरात एका शाळेवर सहा वेळा फेरी होते. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रयोगशाळा लाभदायी ठरली आहे. सामाजिक देणगीतून वाहनखर्च भागविला जात असून वाहनही त्यातूनच खरेदी केले जाते. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर, ग्राम आरोग्यरक्षक, पूरक पोषक आहार यांसारखे विविध उपक्रमही संघाच्या वतीने राबविण्यात येत आहेत.