अन्नधान्य, दुधाची दुकाने केवळ चार तास खुली

ठाणे : ठाणे शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या नौपाडा आणि कोपरी भागातही करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने बुधवारपासून या भागात संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली आहे. येत्या २६ मेपर्यंत नौपाडा आणि कोपरी प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या भागात सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत केवळ अन्नधान्य आणि दूध विक्रीची दुकाने सुरू राहतील. या परिसरातील भाजीच्या घाऊक बाजारपेठा महापालिकेने यापूर्वीच बंद केल्या आहेत. बुधवारपासून याठिकाणी भाजीच्या विक्रेत्यांनाही प्रवेश बंदी असणार आहे.

महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा, दिवा, कोपरी, वागळे इस्टेट, लोकमान्य-सावरकरनगर पाठोपाठ नौपाडा, कोपरी भागातही संपूर्ण टाळेबंदी जाहीर झाल्याने घोडबंदरचा अपवाद वगळता ठाणे महापालिका क्षेत्रातील जवळपास ७५ टक्के परिसरात संपूर्ण टाळेबंदी जाहीर झाली आहे. शहराच्या विवीध भागात संपूर्ण टाळेबंदी जाहीर केली जात असली तरी नौपाडा परिसर अजूनही पूर्णपणे बंद करण्यात आलेला नव्हता. पोलिसांनी नौपाडा, पाचपाखाडी भागातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद करण्याचा सपाटा लावला होता. मात्र, ठाणे महापालिकेने या भागात संपूर्ण टाळेबंदीचा कोणताही निर्णय घेतला नव्हता. गेल्या आठवडय़ाभरात खारकर अळी, चेंदणी कोळीवाडा, महागिरी या पट्टय़ात  करोनाचे रुग्ण सापडू लागल्याने महापालिका प्रशासन सतर्क झाले आहे. याच परिसरात घाऊक किराणा बाजारपेठ आहे. याठिकाणी शहरातील किरकोळ विक्रेते खरेदीसाठी येतात. त्यामुळे करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त  होत होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने चार दिवसांपुर्वी खारकर आळी, जांभळीनाका भागातील घाऊक किराणा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जांभळी नाक्यावरील भाजी मंडईही यापुर्वीच बंद करण्यात आली आहे.  नौपाडय़ातील नागरिकांसाठी भगवती शाळेच्या मैदानात तात्पुरती भाजी मंडई उभारण्यात आली होती. याठिकाणी नागरिक खरेदी गर्दी करीत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे ही भाजी मंडई नुकतीच बंद करण्यात आली ्आहे.

वागळे इस्टेटमध्ये कठोर टाळेबंदीचा निर्णय

वागळे इस्टेट आणि लोकमान्य, सावरकर नगर परिसरात  ३१ मेपर्यंत टाळेबंदीचे नियम आणखी कठोर करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार १७ मे रोजी संपणारी संपूर्ण टाळेबंदीची मुदत वाढवून ३१ मेपर्यंत करण्यात आली आहे. यात अत्यावश्यक सेवेतील दुकानेही पूर्णपणे बंद केली जाणार आहेत. मासळी, मटण आणि चिकन विक्री करणारी दुकाने, अन्नधान्य दुकाने, बेकरी, भाजीपाला आणि फळ विक्री दुकाने तसेच महापालिकेने तात्पुरती सुरू केलेली दुकानेही यापुढे बंद ठेवली जाणार आहेत. या परिसरातील औषध दुकाने तसेच दूध डेअरी सुरू राहतील.

भाजीपुरवठा बंद

बुधवारपासून नौपाडा आणि कोपरी प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या परिसरात संपूर्ण टाळेबंद जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली. ज्या विभागात करोना बाधित रुग्ण सापडत आहेत तो परिसर बंद केला जात आहे. असे असताना प्रतिबंधित क्षेत्रातील नियमही नागरिक पाळत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नौपाडा, कोपरी भागातील अन्नधान्य आणि दुध विक्रीची दुकानेच येत्या २६ तारखेपर्यत सुरू राहतील. सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत ही दुकाने सुरू असतील. या काळात भाजीपाल्याची किरकोळ वा घाऊक बाजारपेठ सुरू राहील, असे माळवी यांनी स्पष्ट केले. या भागात नागरिकांचा वावर पूर्णपणे थांबावा, यासाठी घरपोच भाजी विक्री तसेच इतर जीवनावश्यक सेवाही बंद ठेवली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.