५५ नवे रुग्ण ; २०८ करोनामुक्त, पाच जणांचा मृत्यू

वसई : वसई विरार शहरात मागील काही दिवसांपूर्वी झपाटय़ाने करोना रुग्णांची संख्या वाढत होती. परंतु पालिकेने केलेल्या उपाययोजनांनंतर बाधितांच्या रुग्ण संख्येत हळूहळू घट होऊ लागली आहे. मंगळवारी शहरी व ग्रामीण मिळून केवळ ५५ नवीन रुग्ण आढळून आले. प्रथमच रुग्णसंख्येचा आलेख खाली आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वसई विरार शहरात मागील काही दिवसांपासून सरासरी दीडशे ते दोनशे रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. परंतु मंगळवारीमहापालिकेच्या हद्दीत केवळ ५२ नवीन रुग्ण आढळून आले तर ४ जणांचा करोनामूळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या १५ हजार ९३१ वर गेली आहे. तर मृतांचा आकडा ३३४ वर पोहोचला आहे. तर एकाच दिवशी २०८  रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. आजवर एकूण १३ हजार ६६१ करोनामुक्त झाले आहेत.

१९३६ रुग्ण उपचाराधीन

तसेच वसईच्या ग्रामीण भागात ३ नवे करोनाचे रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण मध्ये करोनाबाधितांची संख्या ७८४ इतकी झाली आहे. मृतांची आकडेवारी २८ गेली आहे.