कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील एका दुकानातून कांद्याच्या गोण्या चोरणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५० किलो वजनाच्या सात गोण्या जप्त केल्या असून, त्याची किंमत १४ हजार रुपये इतकी आहे.

अय्याज इब्राहिम तांबोळी (४०) यांचा कल्याण पश्चिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीचा व्यवसाय आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या दुकानातून कांद्याच्या तीन गोण्यांची चोरी झाली होती. तर शेजारी असलेल्या जाफर यांच्या दुकानातून शुक्रवारी सकाळी चार कांद्याच्या गोणी चोरीला गेल्या. याबाबत त्या दोघांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. तपासाअंती तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चौकशी-दरम्यान त्यांनी महिन्याभरापूर्वी या बाजारातून लसूण आणि नारळाची चोरी केल्याची बाब समोर आल्याची माहिती सपोनि सानप यांनी दिली.