नी. गो. पंडितराव स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ठाणे : गेली ५० वर्षे भाषणकलेची परंपरा जपणाऱ्या नी. गो. पंडितराव स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत या वर्षी कनिष्ठ गटात अभय आळशी आणि वरिष्ठ गटात प्रज्ञा पोवळे विजयी ठरले. समर्थ सेवक मंडळाच्या वतीने दर वर्षी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी ठाण्यातील शिव समर्थ शाळेच्या शिवदौलत सभागृहात पार पडला. या कार्यक्रमासाठी ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपले ठाम मत मांडण्याविषयी आपल्याकडे बौद्धिक आणि नैतिक ताकद असणे हा खऱ्या वक्तृत्वाचा आधार आहे. तो गाजलेल्या भाषणांमधून मिळणार नाही. यासाठी नरहर कुरुंदकर, दुर्गाबाई भागवत, स.शि. भावे, राम बापट यांचे लिखाण वाचायला हवे. वक्तृत्व स्पर्धेत मजकूर खूप महत्त्वाचा ठरतो. मजकूर कसा हवा याचे उत्तम उदाहरण या व्यक्तींचे लिखाण आहे. नियोजित विषय मांडताना विशिष्ट दर्जाचा मजकूर आपल्या विचारसरणीत येतो का हा विचार करायला हवा, असे मत संपादक गिरीश कुबेर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. परीक्षकांना काय वाटेल, कोणत्या मार्गाने बोलल्यावर पारितोषिक मिळेल हे अतिशय क्षुल्लक मुद्दे असून आपल्याला काय म्हणायचे आहे ते ठामपणे मांडण्याचे धारिष्टय़ वक्त्याकडे असणे महत्त्वाचे आहे. मत मांडताना आपल्या बोलण्याने आजूबाजूच्या लोकांना काय वाटेल याचा आपण विचार करू नये. ज्यातून विद्यार्थ्यांची मते मांडली जातील असे विषय निवडणे ही आयोजकांचीही जबाबदारी असते, असे त्यांनी सांगितले. गप्पांमध्ये बोलणारी भाषा अलीकडे दिसत नाही. सांस्कृतिकदृष्टय़ा हे हानिकारक आहे. त्या भाषेतील ललित शब्द मराठी वाङ्मयात येणे थांबलेले आहे. त्यामुळे हे ललित शब्द आपल्या वक्तृत्वात येण्यासाठी वक्त्यांनी विचारशक्तीला चालना द्यायला हवी, असे मार्गदर्शन कुबेर यांनी केले.