प्रवासी संघटनांच्या आंदोलनाची चाहूल लागताच स्कॉयवॉकवरील फेरीवाल्यांचा पळ कल्याण रेल्वे स्थानकातील स्कॉयवॉकवर ठाण मांडून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना सोमवारी सकाळी प्रवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चांगला दणका दिला. प्रवासी संघटनांचे कार्यकर्ते स्थानकात येणार असल्याची चाहूल लागताच फेरीवाल्यांनी गाशा गुंडाळून स्थानक परिसरातून पळ काढल्याचे चित्र दिसून येत होते. यावेळी कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलीसांची संयुक्त भेट घेऊन या भागातील फेरीवाल्यांना तात्काळ हकलवून लावण्याची मागणी केली. प्रवासी संघटनांच्या या आक्रमक आवतारामुळे प्रशासनाची भांबेरी उडाली होती. कल्याण रेल्वे स्थानकातून शहरात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखाचा व्हावा या दृष्टीने एमएमआरडीएच्यावतीने स्कायवॉकची निर्मिती केली आहे. उपनगरीय स्थानकातील सर्वाधिक गर्दीचा असणारा हा स्कॉयवॉक सध्या फेरीवाल्यांच्या कब्जामध्ये गेला आहे. स्कायवॉकवरील जागा अडवून बिनदिक्कतपणे व्यवसाय करणारे फेरीवाले या जागेवर मालकी गाजवू लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांना परिसरातून चालणे सुध्दा अशक्य होत आहे. शिवाय त्यांची सुरू असलेल्या आरडाओरडीमुळे ध्वनीप्रदुषणही वाढीस लागले होते. या फेरीवाल्यांकडे महापालिका अतिक्रमण विभाग, पोलीस प्रशासन, रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलानेही डोळेझाक सुरू केली होती. त्यामुळे फेरीवाल्यांची प्रवाशांना त्रास देण्यापर्यंत मजल गेली होती. शहरातील राजकीय पक्षांनीही आळीमळी गुपचळी घेतल्याने हा त्रास दिवसेंदिवस वाढू लागला होता. अखेर याप्रकरणी प्रवासी संघटनांनी आवाज उठवत या फेरीवाल्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन प्रवासी संघटनांनी फेरीवाले हटवण्याची मागणी करण्यासाठी सोमवारी प्रवासी संघटनांचे कार्यकर्ते रेल्वे स्थानकात दाखल झाले. मात्र या आंदोलनाची पुर्वकल्पना आल्याने प्रशासनाने त्यापुर्वीच येथील फेरीवाल्यांना हटवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी प्रवासी संघटनांनी स्थानक व्यवस्थापकांना घेराव घालून प्रवाशांच्या समस्या सांगत फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी केली. तसेच रेल्वे स्थानक व्यवस्थापक, सुरक्षादलाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह सदस्यांनी संपुर्ण स्थानकाचा दौरा करून पाहणी केली. दुपारनंतर परिस्थिती जैसे थे.. प्रवासी संघटनाच्या आंदोलनावेळी गायब झालेले फेरीवाले दुपारनंतर पुन्हा आवतरू लागले. त्यांनी या भागात पुन्हा बस्तान घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे सकाळी रिकामा झालेले रेल्वे स्थानक पुन्हा फेरीवाल्यांच्या कोलाहालात अडकून पडला होता. फेरीवाल्यांमुळे स्थानकात कचऱ्याचे साम्राज्य पसत असून यापुर्वी कल्याण स्कायवॉकला पाच वेळा आग लागली आहे. त्यामुळे हा स्कायवॉक प्रवाशांसाठी असुरक्षित बनु लागला असल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त करण्यता आली आहे.