मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचा सल्ला; ‘माइंड फेस्ट’ उत्साहात आदिम भावना स्वकेंद्रित, प्रगत भावना सहकेंद्रित आणि उन्नत भावना विश्वकेंद्रित असते. आदिम भावनेतून प्रगत भावनेकडे यायचे असेल तर, आपल्यात साक्षी भाव निर्माण करावा लागेल, असा सल्ला सुप्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी दिला. आयपीएच प्रस्तुत माइंड फेस्ट महोत्सवाचा पहिला दिवस पार पडल्यानंतर डॉ. नाडकर्णी यांनी दुसऱ्या दिवशी, शनिवारी माणसातील ‘मी पणा’ तर तिसऱ्या दिवशी, ‘माझ्या जगण्याचे नेमके काय करायचे’ या विषयावर ज्ञानेश्वरीतील ओव्या आणि विविध ग्रंथांतील संदर्भ देत मार्गदर्शन केले. ‘लोकसत्ता’ सहप्रायोजक असलेल्या माइंड फेस्ट या तीन दिवसीय महोत्सवाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ठाण्यातील समर्थ सेवक मंडळाच्या मैदानात हा महोत्सव उत्साहात झाला. प्रत्येकाची विचार करण्याची पातळी वेगळी असते. प्रत्येक जण त्याच्या विचार शक्तीनुसार समोरच्या माणसाच्या विचारांची तुलना करत असतो. या विचाराच्या माध्यमातून विविध तर्क निर्माण होत असतात, असे डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले. ‘मी पणा’ आणि ‘जन्म-मृत्यू’ या विषयावर बोलताना त्यांनी ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या संदर्भ दिला. प्रत्येकाने स्वत:मध्ये असलेल्या ‘मी’ला समजून घेणे गरजेचे आहे. तसेच स्वत:ला या आजूबाजूच्या परिस्थितीत सामावून घ्यायला हवे. त्यामुळे जगणे अधिक सुखी होईल, असेही डॉ. नाडकर्णी म्हणाले. मूर्तीरूपी देवाची पूजा करण्याऐवजी त्या देवांच्या गुणांकडे अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तसेच मूर्तीपूजेच्या व्यवहारामुळे देवांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे मूर्तीपूजेचा व्यवहार बंद करून दैवतांच्या मूर्तीना निवृत्त करणे गरजेचे असल्याचेही डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी ‘माझ्या जगण्याचे नेमके काय करायचे’ या विषयावर डॉ. नाडकर्णी यांनी ध्यासाविषयी माहिती दिली. ध्यानामुळे सर्वच कामे व्यवस्थित पार पडतात. मात्र, ध्यानासाठी ध्यास महत्त्वाचा असतो. एकाग्रता आणि अनेकाग्रता यांचा संगम झाल्यावर ध्यान चांगले होते, त्यालाच समग्रता म्हणतात. एखादे काम करण्याचा ध्यास निर्माण झाल्यावर तो स्वस्थ बसू देत नाही. उद्दिष्टे स्पष्ट असल्याशिवाय ध्यास पूर्ण होत नाही. प्रेमळ ओढ आणि सातत्यपूर्ण ऊर्जा यामुळे ध्यास प्राप्त होऊ शकतो, असेही डॉ. नाडकर्णी म्हणाले.