वालधुनी नदीच्या काठावर एक हजार कोटींचे प्रकल्प; नदीतील प्रदूषण रोखण्यात मात्र अपयश उल्हासनगर : देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अंबरनाथमध्ये शिवमंदिर सुशोभीकरण, उल्हासनगरात नौकाविहार केंद्र, कल्याणमध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धविहार आणि नगर उद्यान यासारखे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मात्र या प्रस्तावित प्रकल्प ठिकाणांजवळून वाहणाऱ्या वालधुनी नदीची गटारगंगा दुर्लक्षित राहिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वालधुनी नदीतील प्रदूषण रोखण्यास अपयशी ठरलेल्या प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या पुढाकाराने या नदीच्या काठावर मात्र, एक हजार कोटींचा पर्यटन देखावा उभा करण्यात येणार आहे. वालधुनीच्या पात्रात सातत्याने रसायने सोडणे, सांडपाणी सोडणे, कचरा टाकणे आणि अतिक्रमण करण्यासारखे प्रकार होत आहेत. त्यामुळे प्रदूषण रोखायचे कसे, असा प्रश्न शासकीय संस्थांपुढे आहे. एकीकडे वालधुनीच्या प्रदूषणाला रोखण्यात अपयश येत असतानाच विविध नगरपालिका, महापालिका, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वालधुनीच्या किनारी पर्यटन, स्मार्ट सिटीला पूरक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या पुरातन शिवमंदिराच्या सुशोभीकरणासाठी नुकताच ४३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तर उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीत नौकाविहार केंद्रासारखा नागरिकांच्या मनोरंजनासाठीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर केला जात आहे. कल्याण आणि उल्हासनगर शहराच्या वेशीवर वालधुनी किनारी सुमारे २८ एकर परिसरात ८५० कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय बुद्धविहाराची उभारणी केली जाणार आहे, तर कल्याण शहराच्या गौरी पाडा परिसरात वालधुनीच्या किनारी स्मार्ट सिटी योजनेतून पहिल्या टप्प्यात ११४ कोटीपैकी ६४ कोटी रुपयांच्या खर्चातून नगर उद्यान प्रकल्पाची उभारणी होत आहे. पर्यटनदृष्टय़ा हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उभारणीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधीही आग्रही आहेत. मात्र प्रकल्पांची उभारणी होत असली तरी ज्या वालधुनीच्या किनारी हे प्रकल्प उभारले जात आहेत, त्या वालधुनीला प्रदूषणाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. काही दिवसांच्या अंतराने वालधुनी पात्रात सोडल्या जाणाऱ्या रसायनांमुळे वालधुनीच्या पात्राचा रंग बदलतो. अनेकदा दुर्गंधीचा त्रास आसपासच्या रहिवाशांना सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत देश-विदेशातील पर्यटकांना ही स्थळे दाखविताना वालधुनीचे प्रदूषण दाखवणार का, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. या ठिकाणी ३० एकरमध्ये जागतिक बुद्धभवन उभे राहणार आहे. विपश्यणा केंद्र, विद्यार्थी भिक्षू प्रशिक्षण शाळा, आश्रम असा प्रकल्प आहे. मात्र वालधुनी प्रदूषणाचा मोठा त्रास होत आहे. अनेकदा रात्र, अपरात्री तसेच पहाटे दुर्गंधी येत असते. ऐनवेळी काही करता येत नाही. येथे आम्ही भाजीपालाही घेतो, त्यावरही परिणाम होत आहे. भंते गौतम रत्न, बुद्धभूमी, कल्याण नगर उद्यानाच्या बफर क्षेत्रामध्ये भिंत बांधून तिथे झाडे लावण्याचा प्रस्ताव आहे. पर्यावरण प्रदूषणाची नोंद ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पात तरतूद आहे, मात्र प्रदूषण रोखण्यासाठी नदी वाहते त्या ठिकाणी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. तरुण जुनेजा, प्रकल्प अभियंता, स्मार्ट कल्याण-डोंबिवली विकास महामंडळ वालधुनी नदीच्या किनारी कोटय़वधींचे प्रकल्प सुरू असतानाच नदीच्या प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. प्रदूषण रोखल्याशिवाय या प्रकल्पांचे महत्त्वही वाढणार नाही. शशिकांत दायमा, वालधुनी बिरादरी