मुंबई-ठाणे यांसारख्या शहरांत हिवाळा ऋतू तो केवढा? अवघ्या दीड-दोन महिन्यांचा! ही थंडी बोचरी असली तरी शहरवासीयांना ती हवीहवीशी वाटते. किमान त्यानिमित्ताने कुठे तरी कोपऱ्यात पडलेले स्वेटर, शाली, मफलर, कानटोप्या बाहेर पडतात. मग शरीराला या उबदार कपडय़ांचे कवच घालून सकाळचा फेरफटका सुरू होतो.  जागोजागी शेकोटय़ा पेटतात, हात शेकले जातात आणि सोबत गप्पांचेही फड रंगतात किंवा सकाळी फिरून झाल्यावर टपरीवर वाफाळलेल्या चहाने थंडी पळवली जाते. हे सगळं उपभोगण्यासाठी तरी किमान महिनाभर थंडी हवी, अशी आपली अपेक्षा असते. पण त्याच वेळी पदपथावर झोपलेल्यांची हवेतल्या गारठय़ापासून जमेल तितकं अंग चोरून घेत, चिंध्यांच्या गोधडीमध्ये स्वत:ला ऊब देण्यासाठीची धडपड सुरू असते. हातातल्या गोणपाटानेच शरीराचं संरक्षण करून उदरनिर्वाहासाठीची धावपळ सुरू असते. तिथे शेकोटय़ा पेटतही असतील, पण रोजच्या रोज चूल पेटणं अधिक ऊब आणि दिलासा देण्यासारखं असतं.