रहिवाशांच्या आग्रहानंतर ठाणे पालिकेचा निर्णय ठाणे : रुग्णांमध्ये करोना संक्रमणाची गंभीर लक्षणे नसली तरी चाचणी केल्याशिवाय त्यांना घरी न सोडण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने बुधवारी जाहीर केला. सौम्य आणि अति सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोणत्याही चाचणीशिवाय घरी सोडले जावे, असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. रुग्णांत लक्षणांचा अभाव असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच घरी सोडा, असा आग्रह रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून धरला जात आहे, त्यामुळे पालिकेने ही भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी एक आदेश काढत सौम्य, अति सौम्य, मध्यम अथवा अजिबात लक्षणे नसलेल्या रुग्णांना सात, नऊ वा ११ दिवसांनी घरी सोडले जावे, असे निर्देश राज्य सरकारांना दिले आहेत. त्यानुसार घरी सोडताना या रुग्णांवर करोनासंबंधीची कोणतीही चाचणी करण्याची गरज नाही, असे निर्देश राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले. या निर्णयामुळे काही दिवसांपासून रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांचा आकडाही अचानक वाढला आहे. या निर्णयाला स्वत: रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून सातत्याने विरोध केला जात होता. रुग्णात संक्रमणाची लक्षणे नाहीत, परंतु केवळ अहवालात तसे दाखविल्याने काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशा रुग्णांना लक्षणे नाहीत म्हणून घरी सोडण्यात यावे, असे निर्देश केंद्र सरकारच्या नव्या आदेशात म्हटलेले होते. दाट वस्त्यांचा प्रश्न ठाणे, कल्याण-डोंबिवली यांसारख्या शहरांमधील दाट वस्त्यांमधील रुग्णांना अशा प्रकारे घरी सोडणे योग्य आहे का, असा सवालही उपस्थित केला जात होता. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हरकत नोंदवली होती. मंगळवारी सायंकाळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीतही हा मुद्दा प्राधान्याने चर्चिला गेला होता. स्वतंत्र नियमावली केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशानंतरही ठाण्यात मात्र रुग्णांचा अहवाल येत नाही तोवर त्यांना घरी सोडले जाणार नाही, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.चाचणी केल्याशिवाय तसेच अलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था असल्याची खात्री पटल्याशिवाय कोणत्याही रुग्णाला घरी सोडले जाऊ नये, असे या बैठकीत ठरविण्यात आले आहे. ठाणे पालिका हद्दीतील रुग्णांचा मृत्यूदर कमी कसा होईल. तसेच ५० वर्षांवरील रुग्णांवर उपचारासाठी अभ्यास समिती नेमण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.