‘स्टेम’ची यंत्रणा बळकट करून अतिरिक्त ३०० दशलक्ष पाण्याची उचल; पुढील २५ वर्षांच्या जलनियोजनाची ठाणे पालिका आयुक्तांची योजना जयेश सामंत/ नीलेश पानमंद, लोकसत्ता ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढत्या नागरीकरणामुळे वेळोवेळी निर्माण होणाऱ्या पाणीप्रश्नाला उत्तर म्हणून पालिका प्रशासनाने ‘स्टेम’ प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रातून पाणी उचल करणारी यंत्रणा बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेच्या पूर्ततेनंतर ‘स्टेम’च्या माध्यमातून केवळ ठाणेच तव्हे तर मीरा-भाईंदर, भिवंडी या शहरांसह ग्रामीण भागाला एकत्रितपणे ३०० दशलक्ष लिटर वाढीव पाणी मिळणे शक्य होणार आहे. या माध्यमातून ठाणेकरांसाठी पुढील २५ वर्षांचे जलनियोजन होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी व्यक्त केला. ‘स्टेम प्राधिकरणाच्या माध्यमातून २६० कोटी रुपये खर्च करून नवी यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही यंत्रणा प्रत्यक्षात आल्यास उल्हास नदीतून किमान ३०० दशलक्ष लिटर इतके वाढीव पाणी उचलता येणार आहे,’ अशी माहिती डॉ. शर्मा यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत दिली. सद्य:स्थितीत ठाणे महापालिकेस स्टेमच्या माध्यमातून ११० ते १२० दशलक्ष लिटर इतके पाणी मिळते. भिवंडी, मीरा-भाईंदर तसेच ग्रामीण भागासही स्टेम पाणी पुरवते. पाणी उचल क्षमता वाढल्यास ठाणेच नव्हे तर स्टेममध्ये भांडवल असलेल्या या महापालिका आणि जिल्हा परिषदेलाही पाण्याची अतिरिक्त उचल करता येईल. धरण खरेदीसंबंधी राज्य सरकारचे पुढील निर्देश मिळेपर्यंत उपलब्ध जलस्रोत सक्षम करण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये चार स्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. लोकसंख्येच्या तुलनेत होणारा पाणीपुरवठा पुरेसा असला तरी जुन्या जलवाहिन्या, तांत्रिक बिघाड, पाणीचोरी अशा विविध कारणांमुळे उपलब्ध पाणीपुरवठा कमी पडू लागला आहे. शहराचे झपाटय़ाने नागरीकरण होत असताना येत्या काळात ठाणेकरांची पाण्याची गरजही वाढणार आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेसाठी प्रस्तावित असलेल्या शाई धरण लवकरात लवकर उभारण्याची मागणी होत आहे. धरणग्रस्तांचे पुर्नवसन, पाटबंधारे द्यावा लागणार निधी अशा काही मुद्दय़ांवर शासनदरबारी चर्चा सुरू असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. असे असले तरी स्टेमच्या माध्यमातून पाण्याची अतिरिक्त उचल करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने त्यावर काम सुरू झाले आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. सद्य:स्थितीत स्टेमकडे उपलब्ध असलेल्या यंत्रणेद्वारे नदी पात्रातून वाढीव पाणी उचलणे शक्य नाही. ३० वर्षांचे नियोजन शक्य ठाणे महापालिका क्षेत्राला दररोज ३५ दशलक्ष लिटर तर, मिरा-भाईंदर आणि भिवंडी शहराला १५ दशलक्ष लिटर वाढीव पाण्याची गरज आहे. स्टेमकडून वाढीव पाण्यासाठी नदी पात्रात यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यापूर्वी २५० दशलक्ष लिटर इतके पाणी उचलण्याची क्षमता असणारी यंत्रणा बसविण्यात येणार होती. मात्र, नुकत्याच झालेल्या स्टेमच्या बैठकीत २५० ऐवजी ३०० दशलक्ष लिटर क्षमतेची यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे ठाणे शहरासह मिरा-भाईंदर, भिवंडी शहराची तीस वर्षांची जलचिंता मिटणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. ठाणे शहरासाठी प्रस्तावित असलेल्या शाई धरणाचे काम मार्गी लागत नाही तोपर्यंत पर्यायी व्यवस्थेचा विचार करणे गरजेचे आहे. यातूनच केवळ पाणीपुरवठय़ासाठी स्थापन झालेल्या स्टेम प्राधिकरणाच्या माध्यमातून नदी पात्रात पाणी उचलण्यासाठी वाढीव क्षमतेची यंत्रणा बसविण्याचा निर्णय नुकताच झाला आहे. - डॉ. विपिन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका