कल्याण येथील म्हारळ गावात दोन चुलत भावांची अनोळखी व्यक्तींनी बुधवारी रात्री धारदार शस्त्रांनी हत्या केल्याने खळबळ उडाली. निर्घृण हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी दोन्ही भावांची गुप्तांगे कापून क्रूरतेचा कळस केला आहे. या प्रकारामुळेपोलीस चक्रावून गेले आहेत.
मदन सुनार (३०, रा. गोलमैदान, उल्हासनगर), राजू सुनार (२९, रा. म्हारळगाव) अशी हत्या झालेल्या चुलत भावांची नावे आहेत. या हत्येप्रकरणी उल्हासनगर येथील गोलमैदान भागात राहणारे लालबहादूर सुनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री राजू गस्तीवर होता.
या वेळी गोलमैदान येथे राहणारा त्याचा भाऊ मदन राजूला भेटण्यासाठी म्हारळ येथे आला. राजू रात्रीच्या वेळेत गस्त घालत असताना मदनही त्याच्यासोबत होता.
अनोळखी व्यक्तींनी या दोन्ही भावांना आडबाजूला नेऊन त्यांची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या केली. येथेच अनोळखी मारेकरी थांबले नाहीत तर त्यांनी या दोन्ही भावांची गुप्तांगे कापून नेली. वादातून किंवा पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.