माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आरोप

ठाणे : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सने बांधलेल्या दोन इमारतींमध्ये चार मजल्यांचे अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. तसेच आठ वर्षांपूर्वीच हे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश तत्कालीन महापालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र, अद्यापही या अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांच्याविरोधात येत्या दोन दिवसांत सर्वसामान्यांची फसवणूक केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचेही ते म्हणाले.

खोपट येथील भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप केले. वर्तकनगर येथील रेमंड कंपनी परिसरात आमदार प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सकडून २००८ मध्ये चार इमारती बांधण्यात आल्या आहेत. यातील दोन इमारतींना अद्यापही वापर परवानाही मिळालेला नाही. तसेच या इमारतींचे ९ ते १३ मजले हे अनधिकृतपणे बांधण्यात आले होते. २०१२मध्ये या अनधिकृत मजल्यांवर कारवाईचे आदेश तत्कालीन महापालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र, अद्यापही या इमारतींवर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. प्रताप सरनाईक यांनी या इमारतींमध्ये सदनिका घेणाऱ्या सर्वसामान्यांची फसवणूक केली असून त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी सोमय्या यांनी या वेळी केली. प्रताप सरनाईक यांच्या या अनधिकृत बांधकामप्रकरणी येत्या दोन दिवसांत वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रारही देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरनाईक यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

१०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा

महापालिकेने हे मजले अनधिकृत असल्याची नोटीस काढल्यानंतर महापालिकेच्या लोकमान्य नगर येथील शाळा बांधून दिल्याने विकास हक्क हस्तांतरच्या (टीडीआर) मोबदल्यामध्ये मिळालेले चटईक्षेत्र वापरून तसेच दंड आकारून महापालिकेने मजल्यांना परवानगी दिलेली आहे. तसेच वापर परवाना (ओसी) मिळण्यास विलंब होत असला तरीही या बांधकामामध्ये चटईक्षेत्राचे उल्लंघन झालेले नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामाचा प्रश्न निर्माण होत नाही. सोमय्या यांनी आठ वर्षे जुने प्रकरण बाहेर काढून जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.