|| भगवान मंडलिक उपजीविकेचे साधन म्हणून सरकारी भूखंड वाटप कल्याण : कल्याण तालुक्यातील नडगाव येथील २९ कातकऱ्यांना १७ वर्षापूर्वी वाटप केलेले सरकारी भूखंड पुन्हा संबंधित कातकरी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कल्याणचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) अभिजित भांडे पाटील यांनी घेतला आहे. कातकरी समाजातील कुटुंबीयांच्या पुढील पिढ्यांना उपजीविकेचे साधन म्हणून या भूखंडांचा चांगला वापर करता येईल, या उद्देशातून हे भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण तालुक्यातील नडगाव येथील २९ कातकरी समाजातील कुटुंबांना १७ वर्षापूर्वी शासनाने २९ भूखंड चरितार्थ चालविण्यासाठी दिले होते. दरम्यानच्या काळात जबरदस्ती करत काही दलालांनी त्या भूखंडावर बेकायदा चाळी, पत्र्याचे निवारे बांधले. चाळीतील खोल्या भाड्याने रहिवाशांना देऊन कमाईचे साधन तयार केले. शासकीय भूखंडांचा वापर कातकरी कुटुंब चरितार्थासाठी करत नाहीत तर काही ठरावीक दलालांना पैसे कमवून देण्यासाठी तो होत आहे, असे गावातील निसर्ग संवर्धन संस्थेचे निखिल कशिवले यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ग्रामपंचायत, तलाठी, तहसीलदार, लोकायुक्तांकडे याविषयी तक्रारी केल्या. या प्रकरणी महसूल विभागाच्या वरिष्ठांनी चौकशीचे आदेश दिले. तलाठी, मंडल अधिकारी यांनी नडगाव येथील कातकरींना वाटप केलेल्या भूखंडांची पाहणी केली. तेथे चाळी, पत्र्याचे निवारे बांधण्यात आले आहेत असे निदर्शनास आले. या भूखंडांचा वापर कातकरींनी भातशेती, भाजीपाला इतर लागवडीसाठी करुन उपजीविका करावी असा शासनाचा उद्देश होता. त्या उद्देशाला येथे हरताळ फासून शर्तभंग केला आहे, असा अहवाल तलाठींनी कल्याण तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला. शर्तभंग झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून त्या जागेवरील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले. कल्याणचे प्रांत अभिजित भांडे पाटील यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. ज्या २९ कातकरी समाजाच्या कुटुंबीयांना हे भूखंड वाटप केले होते त्यांच्या सुनावण्या घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्या वेळी हे भूखंड आम्हाला कधी वाटप केले याची कोणतीही माहिती, कागदपत्र आमच्याकडे नाहीत. हे भूखंड सरकारला जमा करून घ्यायचे असतील तर त्यांनी ते करून घ्यावेत. हे भूखंड आमचे आहेत हे आम्हाला कधी समजलेच नाही, अशी धक्कादायक उत्तरे कातकरी कुटुंबीयांनी सुनावणीच्या वेळी दिली. कातकरी कुटुंबांना या भूखंडाविषयी कोणतीही माहिती नाही. त्यामुळे हे भूखंड भूमी अभिलेख विभागाने मोजून, त्यांचे सीमांकन करून पुन्हा २९ कातकरी कुटुंबीयांना समान हिश्शाने ताब्यात द्यावेत, असे आदेश प्रांत भांडे पाटील यांनी दिले आहेत. नडगावमधील २९ सरकारी भूखंड आपल्या मालकीचे आहेत हे संबंधित कातकरी कुटुंबीयांनाही माहिती नव्हते. त्यांच्याकडे त्या भूखंडांचे कोणतेही पुरावे नाहीत. ते भूखंड शासनाने परत घ्यावेत अशी भूमिका त्यांनी सुनावणीच्या वेळी घेतली. बांधकामात कातकरींचा सहभाग नाही हे स्पष्ट झाले. त्यांच्या पुढील पिढ्यांच्या उपजीविकेचा आणि समाजकल्याणाचा विचार करून हे भूखंड कातकरी कुटुंबीयांना परत देण्याचा निर्णय घेतला आहे. - अभिजित भांडे पाटील, उपविभागीय अधिकारी, कल्याण (सरकारी भूखंडावर बांधण्यात आलेला पत्र्याचा निवारा.