अंबरनाथ पालिकेच्या डॉ. बी.जी. छाया रुग्णालयाची अनेक वर्षांपासून रिक्त असलेली डॉक्टरांची पदे अखेर भरली जाणार आहेत. रिक्त जागांमुळे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना योग्य उपचार मिळत नव्हता. त्यामुळे आता रुग्णांच्या वैद्यकीय सेवेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
तालुक्याचे शहर असल्याने शहरी आणि ग्रामीण भागातील अनेक रुग्ण पालिकेच्या या रुग्णालयाचा आसरा घेत असतात. मात्र ६२ खाटांच्या या रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टरांची पदे रिक्त होती. त्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नव्हते. त्यात साधनसामुग्रीच्या अभावाने रुग्णांच्या त्रासात आणखीच भर पडली होती. याआधी वेळेवर मानधन न मिळाल्याने डॉक्टरांनी आपली सेवा देणे बंद केले होते. तेव्हापासून रुग्णांना मोठय़ा प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत होते. अखेर या प्रकरणी पालिकेचे मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी बैठक घेत डॉक्टरांच्या रिक्त जागांसाठी निविदा काढली. त्याला प्रतिसाद म्हणून आलेल्या तीनपैकी राष्ट्रीय आरोग्य न्यास संशोधन संस्थेला यापुढे वैद्यकीय सेवा देण्यासाठी नियुक्त केले जाणार आहे. यावर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाणार आहे.