रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी आणि बांधकाम व्यावसायिकांनी मोठा गाजावाजा करत चिखलोली रेल्वे स्थानकासाठी प्रचार सुरू केला असला, तरी येत्या पाच वर्षांच्या मध्य रेल्वेच्या नियोजनात चिखलोली रेल्वे स्थानक प्रस्तावित नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकांवरील गर्दीचा भार आणखी काही वर्षे तरी कमी होण्याची शक्यता नाही. उलट वाढत्या लोकसंख्येनुसार प्रवाशीसंख्या वाढल्याने या स्थानकांतील सोयीसुविधांवर ताण वाढण्याचीच भीती आहे. येत्या पाच ते सात वर्षांत मध्य रेल्वेतर्फे मुंबई आणि उपनगरात ४५ नव्या रेल्वे स्थानकांची निर्मिती आणि विस्तारीकरण केले जाणार असल्याची माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यात अंबरनाथ आणि बदलापूर यांच्यामधील प्रस्तावित चिखलोली स्थानकाचे नाव येणे अपेक्षित होते. मात्र टिटवाळा- मुरबाड नव्या रेल्वे मार्गासह विरार-वसई, विरार-डहाणू, ठाणे-ऐरोली, ठाणे-मुलुंड यांतील स्थानकांचाच उल्लेख होता. याबाबत रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चिखलोली स्थानकाचे येत्या पाच वर्षांत कोणतेही नियोजन नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांना विचारले असता, ‘चिखलोली स्थानकाचा येत्या पाच ते सात वर्षांत निर्मितीचा कोणताही प्रस्ताव नाही. असे कोणतेही नियोजन नसल्याचे प्रस्तावित स्थानकांच्या यादीत त्याचे नाव नाही. बहुतेक वेळा बांधकाम व्यावसायिक स्वत:च्या फायद्यासाठी अशा गोष्टी चर्चेत आणत असतात. मात्र सध्या तरी चिखलोलीचा कोणताही प्रस्ताव नाही,’ असे ते म्हणाले.