पक्षी अभयारण्य, पर्यटनस्थळ विकसित करण्याचा महापालिकेचा निर्णय कल्याण : कल्याणपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबिवलीजवळील बल्याणी टेकडीवर कल्याण-डोंबिवली महापालिकेने जैवविविधता उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. या टेकडीवर ४० एकर जागेत विस्तीर्ण उद्यान विकसित करण्यात येणार असून त्यात निसर्ग उद्यान, पक्षी अभयारण्य यांसह विविध उद्यानांची निर्मिती केली जाणार आहे. निसर्ग संवर्धनाच्या कामासाठी डीसीबी बँकेने आय नेचर फाऊंडेशन या निसर्गप्रेमी संस्थेच्या माध्यमातून कल्याण-डोंबिवली पालिकेला तीन कोटी रुपयांचा सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) उपलब्ध करून दिला आहे. टिटवाळा-कल्याण-डोंबिवली ते काटई-हेदुटणे या २१ किलोमीटरच्या बाह्य़वळण रस्ते मार्गात २१०० झाडे बाधित झाली. या प्रकल्पात तोडलेल्या एका झाडामागे पाच झाडे लावण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. अशा प्रकारे १५ हजार झाडे बल्याणी येथील ४० एकर जागेत वन विभागाच्या साहाय्याने लावण्यात आली आहेत. या कामासाठी प्राधिकरणाने दोन कोटी रुपये दिले. टेकडीवर पाण्याची तळी तयार केली आहेत. पाणी तसेच घनदाट झाडीमुळे येथे विविध प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास वाढला आहे, असे शहर अभियंता सपना कोळी यांनी सांगितले. वड, पिंपळ, बदाम, नागकेसर, आंबा, बाहवा, शिसम, चेरी, पेरू, फणस, उंबर, करंज, कडुनिंब, बकुळ, चिंच, कदंब वृक्षांची लागवड या ठिकाणी करण्यात आली आहे. काय करणार? ’ ४० एकर टेकडी भागाचा पक्षी अभयारण्य, पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा यासाठी पालिकेच्या सहकार्याने ‘आय नेचर फाऊंडेशन’चे संचालक आयझ्ॉक किहिमकर, अध्यक्षा शुभलक्ष्मी यांनी या भागात निसर्गसौंदर्य पदपथ, फूलपाखरू उद्यान, मधुमक्षिका उद्यान, औषधी वनस्पतींचे वन, विरंगुळा केंद्र, वटवाघळे अधिवास केंद्र उभारण्यास सुरुवात केली आहे. येत्या तीन वर्षांत हे प्रकल्प पूर्ण होतील. ’ वटवाघळे, भुंगा, फूलपाखरे वनस्पती बियांचे वाहक असतात. त्यांच्या माध्यमातून रोपांची निर्मिती होत असते. हा विचार करून या पक्ष्यांचा अधिवास अधिक संख्येने वाढावा म्हणून टेकडीवर घाणेरी, फूलझाडे, लिंबू, कडीपत्ता झाडांची लागवड केली जाणार आहे. ’ या जैवविविधता उद्यानात पर्यटन, विरंगुळा, पक्षी निरीक्षण यांसाठी अधिकाधिक पर्यटकांनी यावे या दृष्टिकोनातून त्याचा विकास केला जाणार आहे. ’ या उद्यानाच्या माध्यमातून या भागात पर्यटनस्थळ विकसित झाले तर येथे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. स्थानिक रहिवाशांना रोजगार मिळेल. त्यांना या उद्यान प्रकल्पात सहभागी करून निसर्ग संवर्धनाच्या कामात जोडले जाणार आहे, असे सपना कोळी यांनी सांगितले. पर्यावरणाचा समतोल राखणे, प्रदूषणमुक्तीसाठी शहरातील मोकळ्या जागांमध्ये वनराई विकसित झाली पाहिजे. हाच विचार करून आंबिवलीजवळ ४० एकर जागेत निसर्ग संपदेबरोबर पक्षी, फूलपाखरू उद्याने विकसित केली जात आहेत. येत्या तीन वर्षांत जैवविविधता उद्यान प्रकल्प पूर्ण होईल. - डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका कल्याण-डोंबिवलीतील रहिवाशांसाठी शहराजवळ सर्वागसुंदर निसर्ग उद्यान असावे. पक्षी, निसर्गसंपदेचा शहरवासीयांना लाभ घेता यावा. या विचारातून जैवविविधता उद्यान आंबिवलीजवळ बल्याणी टेकडी येथे कल्याण-डोंबिवली पालिकेच्या सहकार्याने उभारले जात आहे. - आयझ्ॉक किहिमकर, संचालक, आय नेचर फाऊंडेशन