भिवंडी शहरातील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत सोमवारी पहाटेच्या सुमारास कोसळली होती. त्यानंतर एनडीआरएफ जवानांकडून या ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू झालं होतं. आज सकाळी हाती माहितीनुसार या दुर्घटनेतील मृतांची संख्या ३९ वर पोहचली आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. तसेच, ठाणे महापालिकेने या दुर्घटनेतील सर्व मृतांची ओळख देखील पटवली असल्याचे सांगण्यात येत आहे. इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच, या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आजखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. भिवंडी महापालिकेने शहरातील १०२ धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून, अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असेही शिंदे यांनी सांगितले आहे. #UPDATE Maharashtra: Death toll rises to 39 in the Bhiwandi building collapse incident in Thane. Rescue operation underway. 25 people have been rescued till now. — ANI (@ANI) September 23, 2020 सुमारे ४५ वर्षे जुन्या या इमारतीत ४० कुटुंबं राहत होती. महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश होता. ही इमारत रिकामी करण्याची नोटीसही महापालिकेने बजावली होती. जिलानी इमारत दुर्घटनाप्रकरणी तत्कालीन प्रभाग समिती -३ साहाय्यक आयुक्त सुदाम जाधव आणि अभियंता दुधनाथ यादव यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश भिवंडी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.