हौशी गिर्यारोहकांकडून दुर्गम भागातील घरात सौरदिव्यांचा पुरवठा

दिवाळी हा प्रकाशाचा सण. या दिवसांत घरोघरी तेजोमय वातावरण पाहायला मिळते; पण मुंबई-ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या डोंगराळ प्रदेशातील वाडय़ा, वस्त्यांसाठी वर्षांचे १२ महिने अंधाराने दाटलेले असतात. खेडय़ापाडय़ात वीज पोहोचवण्याच्या सरकारी धोरणांचा येथे प्रकाशच पडत नाही. अशा वेळी अनेकदा समाजाचे हात अंधाराला दूर सारण्यासाठी सरसावतात. अशाच सामाजिक बांधिलकीतून मुंबई, ठाण्यातील चार गिरिप्रेमी मित्रांनी यंदा महिपत गडावरील वीज नसलेल्या घरात सौरदीप लावून तेथील रहिवाशांच्या जीवनात प्रकाश आणला. दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच हे घर प्रकाशाने उजळत असताना त्या प्रकाशाच्या साक्षीनेच या चार मित्रांनी यापुढील प्रत्येक दिवाळीत एक घर प्रकाशमय करण्याचा निर्धार केला आहे.

साहस आणि भटकंतीची आवड असणारे अनेक गिर्यारोहक तरुण सह्य़ाद्रीच्या डोंगरकपाऱ्यांमध्ये हिंडून गडकिल्ल्यांना नियमितपणे भेट देत असतात. या मोहिमांदरम्यान त्यांना मदत होते, ती येथील आदिवासींची. डोंगरातील पायवाटा, कडेकपाऱ्या या साऱ्यांशी परिचित असलेली ही स्थानिक मंडळी गिर्यारोहकांचे वाटाडय़ा बनतात. या मोबदल्यात त्यांना काही रक्कम मिळते; पण त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या सर्वच आदिवासी कुटुंबांच्या दैनंदिन जगण्यातील दाहकता अशा मोबदल्यांनी कमी होत नाही. त्यामुळेच मुंबई-ठाण्यातील गिरीविहंग ट्रेकर्सच्या चार शिलेदारांनी यंदा मोबदल्यापर्यंत न थांबता येथील जगण्यातील काळोख दूर करण्यासाठी पुढाकार घेतला.

‘गिरीविहंग’च्या बिपिन मोरे, प्रसाद मुळे, ओंकार भाटकर आणि छायस झारकर यांनी महिपतगडावरील महादू भंडारे यांचे एकमेव घर सौरदिव्यांनी उजळून टाकले. त्यामुळे चुलीतला विस्तव आणि रॉकेलचा मिणमिणता दिवा याशिवाय प्रकाश न पाहिलेले भंडारे यांचे घर उजळले आहे. खेडपासून ३५ किलोमीटरवर असलेल्या महिपतगडावर महादू भंडारे यांचे एकमेव घर त्यापैकी एक. गेली अनेक वर्षे गिर्यारोहणानिमित्त येणाऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्याचे काम भंडारे कुटुंबीय करत आहेत. दुर्गम भागात एखाददुसरी घरे असल्याने गडकिल्ल्यांवरील वस्त्यांमध्ये अद्याप वीजपुरवठा होऊ शकलेला नाही. त्यामुळे अशा ठिकाणचा काळोख सौरऊर्जेद्वारे दूर करण्याचा निर्णय घेतल्याचे या गिर्यारोहकांनी सांगितले. एवढेच नव्हे तर गडकिल्ल्यांवरील अशी दुर्लक्षित घरे शोधून तिथे प्रकाशदिवे पोहोचविण्याचा संकल्प या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

दिवाळीच्या आधी आम्हाला महादू भंडाऱ्यांच्या घरी सौरदिवे लावायचे होते. मुंबईतील गोरेगाव येथील प्रदर्शनातून आम्ही सोलर पॅनल खरेदी केले. या दिव्यांबरोबरच भंडारे कुटुंबीयांना नवीन कपडे, आकाशकंदील आणि फराळ घेऊन गेलो. त्या वेळी त्यांना झालेला आनंद पाहून आमची दिवाळी खऱ्या अर्थाने सार्थकी लागली.

बिपिन मोरे, गिर्यारोहक, गिरीविहंग ट्रेकर्स