भगवान मंडलिक कल्याण- येणाऱ्या काळात ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातील पाण्याची उपलब्धता. त्या पाण्याचे नियोजन आणि वापर याचे आराखडे तयार करण्यासाठी भूजल सर्व्हेक्षण आणि विकास संस्थकडून जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर भागातील भूजल स्त्रोत आधारित नकाशे तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती या विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. जानेवारी, फेब्रुवारीनंतर ठाणे जिल्ह्याच्या अनेक भागात पाणी टंचाई सुरू होते. ग्रामस्थ, गाईगुरांचे पाण्यासाठी हाल होतात. वर्षानुवर्षाचे हे दुष्टचक्र कमी करण्यासाठी भूजल सर्व्हेक्षण विभागाने जिल्ह्यातील विविध भागातील भूजल उपलब्धतेचे नकाशे तयार करण्याचे नियोजन केले आहे. शहापूर तालुक्याला सर्वाधिक पाणी टंचाईची झळ मार्च ते मे या कालावधीत बसते. त्यामुळे भूजल नकाशे तयार करण्याचा पहिला पथदर्शी प्रकल्प शहापूरमध्ये राबविण्यात येणार आहे, असे अधिकारी म्हणाला. शासनाच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातर्फे जलजीवन मोहिमेंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्राचे सहकार्य घेण्यात येणार आहे. या उपक्रमात सर्व्हेक्षणातून पुढे आलेल्या ठिकाणांचे नकाशे तयार केले जातील. या नकाशांचा आधार घेऊन त्या भागात जलसंधारण, संसाधन विकासाची कामे हाती घेणे शक्य होणार आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. अचूक जलस्त्रोताच्या ठिकाणी जलसंधारणाची कामे हाती घेणे शासनाला शक्य होणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांना या नियोजनाचा खूप लाभ होणार आहे. महाराष्ट्र सुदूर संवेदन केंद्र आणि उपयोजन केंद्राकडून उपग्रहाच्या माध्यमातून जलस्त्रोतांची छायाचित्र घेतली जातील. त्या आधारे नकाशे तयार केले जातील. जलस्त्रोतांची छायाचित्र, नकाशे यांचा आधार घेऊन येत्या ऑक्टोबरपासून विभागाचे कर्मचारी नकाशात निश्चित केलेल्या भौगोलिक ठिकाणी भेटी देतील. त्या भागातील विहिरींची पाण्याची पातळी, अन्य जलस्त्रोत याची माहिती जमा केली जाईल. त्या भौगोलिक ठिकाणची समग्र माहिती संकलित झाल्यानंतर त्या भौगोलिक भागाचा भूजल स्त्रोताचा नकाश तयार केला जाणार आहे. या नकाशावरुन कोणत्या भागात किती पाणी आहे. ते किती काळ साठवण म्हणून राहू शकते याचा ताळेबंद ठेवणे शक्य होणार आहे, असे अधिकारी म्हणाला. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण भूजल स्त्रोत विभागातील कर्मचाऱ्यांना हा उपक्रम राबविण्यासाठी येत्या महिन्यापासून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जलस्त्रोतांच्या ठिकाणी घ्यावयाच्या अचूक नोंदी, परिसर पाहणी याचा त्यात समावेश आहे. शहापूर तालुक्यातील ८५ टक्के नळ पाणी योजना आणि ४५ टक्के सिंचन भूजलावर अवलंबून आहे. तालुक्यातील तहान भागविण्यासाठी मोठे जलस्त्रोत नाहीत. दरवर्षी शहापुरला पाणी टंचाईचा फटका बसतो. त्यामुळे या उपक्रमासाठी शहापुरची निवड प्राधान्याने करण्यात आली आहे. भूजल स्त्रोतांचे नकाशे अद्ययावत केल्यानंतर भूजल पातळीचा अंदाज घेणे. त्याची साठवण आणि वापर याचे नियोजन करणे शक्य होणार आहे. कुपनलिका, विंधन विहिरींची ठिकाणे अचूक निश्चित करणे या उपक्रमामुळे सोपे होणार आहे. ठाणे जिल्ह्याच्या बहुतांशी तालुक्यात हा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. डाॅ. शिवाजी पद्मने, उपसंचालक भूजन सर्व्हेक्षण विकास संस्था