उल्हासनगर : दिसायला सावळी आहे आणि लग्नात हुंडाही दिला नाही म्हणून एका विवाहितेला जाळून मारण्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ ग्रामीण परिसरात घडला आहे. ही आत्महत्या असल्याचा बनावही सासरच्यांनी केला होता. पण पोलीस तपास आणि शवविच्छेदनात ही हत्या असल्याचे उघड झाले. याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाइन पोलीस ठाण्यात दोघांविरोधात हत्या आणि हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पती आणि सासूला अटक करण्यात आली आहे.

काकडवाल येथील दूधकर कुटुंबातील वैशाली हिचा विवाह वसारच्या संगम वायले याच्याशी दोन वर्षांपूर्वी झाला होता. वैशाली विज्ञान शाखेतील पदवीधर होती. मात्र विवाहप्रसंगी योग्य मानपान आणि दागिने न दिल्याने पती संगम आणि सासू लीलाबाई तिचा अतोनात छळ करत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

२० जुलै रोजी मध्यरात्री वैशाली हिचा पती आणि सासूने तिला जिवंत जाळले. यात तिचा मृत्यू झाला. मात्र वैशालीने आत्महत्या केल्याचे तिच्या घरच्यांना सांगण्यात आले. त्यामुळे याप्रकरणी सुरुवातीला आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केल्यावर संशय बळावला. पोलिसांनी वैशालीचा मृतदेह मुंबईच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. वैशालीच्या अंगावर जखमा असल्याचे समोर आले होते.