ठाणे : अजित पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली, यावेळीच कुटुंब एक असले तरी राजकीय भूमिका वेगळ्या आहेत स्पष्ट झाले होते, असे सांगत पवार कुटुंबाच्या नात्यावर राजकीय पोळी भाजू नका, असा सल्ला राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे. श्रीनिवास पवार हे उपमुख्य मंत्री अजित पवार यांचे मोठे बंधू असून त्यांनी अजित पवार यांची साथ सोडत त्यावर भाष्य केले होते. त्याचाच आधार घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टिका केली होती. त्यावर आता राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. रक्ताची नातीच म्हणजे कुटुंब नाही. दोन जुलै रोजी अजित पवार यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली. त्यावेळी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या भूमिकेशी संलग्न होऊन कुटुंब म्हणून आम्ही आणि महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्ते अजित पवार यांच्याबरोबर उभे राहिलो, असे आनंद परांजपे यांनी म्हटले आहे. हेही वाचा : ठाकुर्लीत ९० फुटी रस्त्यावरून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले, दुचाकीस्वारांच्या घिरट्या सुरू बारामतीची जनता हेच अजित पवार यांचे कुटुंब आहे. बारामती लोकसभेच्या निवडणुकीत हे संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसेल, असा दावाही त्यांनी केला. अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीमध्ये शंका व्यक्त केली होती की बारामतीमध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला एकटे पाडले जाईल. पण महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचे कुटुंब असून ते त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत, असेही ते म्हणाले. माझी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना विनंती आहे की, पवार कुटुंबाच्या नात्यावर आपली राजकीय पोळी भाजू नका. आपल्या कुटुंबामधील आपले कौटुंबिक संबंध अधिक वृद्धिंगत कसे होतील, त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावे, असा सल्ला त्यांनी आव्हाड यांना दिला आहे. जितेंद्र आव्हाड हे हे आमचे श्रद्धास्थान असलेल्या शरद पवारांपेक्षाही मोठे झालेले आहेत. वारंवार ते बोलतात पवार साहेबांची चूक झाली. परंतु पवार साहेबांची चूक काढण्याएवढे ते मोठे झालेले नाहीत याचा प्रत्यय दोन दिवसांपूर्वी कळव्यामध्ये आला आहे. भारत जोडो यात्रेचे बॅनर लागले होते. त्यामध्ये एकीकडे म्हणायचे शरद पवार हे आमचे बाप आहेत. परंतु मोठ्या बॅनरवर फक्त राहुल गांधींचा आणि स्वतःचा फोटो होता. आपण ज्याला बाप म्हणतात त्या बापाचा फोटो बॅनर वर नव्हता, असा टोलाही त्यंनी लगावला आहे. हेही वाचा :गणपत गायकवाडांच्या नाराजीमुळे खासदार श्रीकांत शिंदे सावध, कल्याण पूर्वमध्ये विकासकामांचा धडाका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रांत अध्यक्ष खासदार सुनील तटकरे या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये जेवढ्या लोकसभेच्या जागा मिळतील, त्या सगळ्या जागेवर महायुतीचा घटक पक्ष म्हणूनही राष्ट्रवादीचा उमेदवार घड्याळ चिन्ह घेऊन विजय होईल. हा आमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा संकल्प आणि मानस आहे, असेही ते म्हणाले.