तुम्हा दोन जणांना भारतीय टपाल खात्यात नोकरीला लावतो. आमची टपाल विभागात ओळख आहे, असे खोटे सांगून दिवा येथील मुंब्रा देवी भागात राहत असलेल्या दीर, वहिनीकडून मुरबाड येथील दोन जणांनी नऊ लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. तर, दीड वर्ष झाले तरी नोकरी नाही आणि दिलेले पैसे परत मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या दोन जणांनी कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

जगदीश नरसु हरड (३४, रा. प्रेमविराज इमारत, श्लोकनगर, मुंब्रादेवी, दिवा, ठाणे) असे तक्रारदाराचे नाव आहे. लता नीलेश हरड , लता सुरेश ठाकरे (रा. नागाव, माझगाव, ता. मुरबाड, ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, जगदीश हरड आणि त्यांची वहिनी आरती नीलेश हरड हे संचित इमारत, मुंब्रादेवी वसाहत, दिवा येथे राहतात. त्यांची ओळख आरोपी महिलांशी झाली. लता हरड आणि लता ठाकरे यांनी तक्ररादार जगदीश, आरती यांना आमची भारतीय टपाल विभागात ओळख आहे. आम्ही तुम्हाला तेथे नोकरीला लावतो. यासाठी नऊ लाख रुपये भरावे लागतील, असे खोटे अमिष दाखविले.

दीड वर्ष झाले तरी नोकरी नाहीच –

केंद्र सरकारी खात्यात नोकरी मिळते म्हणून जगदीश, आरती यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन टप्प्यात आरोपींना चार आणि पाच लाख रुपयांच्या रकमा दिल्या. पैसे स्वीकारल्या नंतर लवकरच तुमचे नोकरीच्या नियुक्तीचे आदेश निघतील. ते हातात आले की आम्ही तुम्हाला देतो असे आरोपींनी तक्रारदारांना सांगितले. दीड वर्ष झाले तरी नोकरी नाहीच, पण दिलेले पैसे आरोपी परत करत नसल्याने आपली फसवणूक आरोपी करत आहेत, हे लक्षात आल्यानंतर तक्रारदार जगदीश यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.