एमएमआरडीएचा अहवाल

कल्याण शहराचा मुख्य विस्तार तसेच नागरीकरण हे शहाड, उल्हासनगरच्या बाजूने होत आहे. त्यामुळे कल्याण शहरातून जाणाऱ्या प्रस्तावित मेट्रोचा मार्ग लाल चौकी, सहजानंद चौक, खडकपाडा ते बिर्ला महाविद्यालय, शहाड अशा भागातून नेण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेतर्फे मुंबई एमएमआरडीएकडे करण्यात आली.

यावर प्राधिकरणाने प्रस्तावित मार्ग बदलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या मेट्रो मार्गाचे काम सुरू होण्यापूर्वीच मेट्रो मार्ग बदलण्याची मागणी करणार असल्याचे शिवसेनेचे कल्याण पदाधिकारी रवी पाटील यांनी सांगितले. ठाणे-भिवंडी ते कल्याण मार्गाचा प्रस्ताव ‘एमएमआरडीए’ने मंजूर केला आहे. कल्याणमधून जाणारा मेट्रो मार्ग पश्चिम दिशेने आणि शहराच्या एका कोपऱ्यावरून लाल चौकी, कल्याण मेट्रो आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय असा प्रस्तावित आहे. नागरीकरणाचा विचार करून हा मार्ग लालचौकीहून बाजार समितीकडे न नेता हा मार्ग सहजानंद चौक, खडकपाडा असा नेण्याची शिवसेनेची मागणी आहे.

  • सप्टेंबर २०१६ मध्ये सल्लागार कंपनीने अहवाल तयार केला आहे. त्यानंतर प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
  • २३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गावर ठाणे ते कल्याणपर्यंत १६ उन्नत स्थानके असणार आहेत. उद्योग व्यवसायाचे केंद्र असलेल्या भिवंडी शहरास सार्वजनिक परिवहन उपक्रमाने जोडणे हा या मार्गाचा उद्देश आहे. ही तिन्ही शहरे दळणवळणाने एकमेकांना जोडली तर वाहतूक, गर्दीचे विकेंद्रीकरण होणार आहे.
  • कल्याणमधील प्रस्तावित स्थानके दूर वाटत असली तरी या भागातील वाहतुकीसाठी परिवहन विभाग, केडीएमटी प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या जातील. कल्याणचा बाजार समितीपर्यंतचा मेट्रो मार्ग पुढे तळोजा शहरापर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे.