जून अखेरपासून बाजारात शेवळी, करटोली, टाकळाचे आगमन पुणे, नाशिक जिल्ह्य़ातून येणाऱ्या भाज्यांची आवक अद्याप कमी असतानाच सर्वसामान्यांना पावसाळी भाज्यांचा पर्याय उपलब्ध होऊ लागला आहे.या हंगामी भाज्या औषधी मानल्या जातात. वर्षांतून एकदा तरी रानभाज्या खाव्यात अशी खेडेगावातील पिढय़ान पिढय़ाची परंपरा आहे. त्यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागांतही त्यांना मागणी असते. येत्या महिनाभरात जंगलामध्ये टाकळा, कोहळू, लोथ, करटोली, या भाजांचा हंगाम सुरू होईल. या भाज्या एक ते दोन महिने फक्त जंगलात उगवतात. टाकळा भाजी शेताच्या कडेला, डोंगराच्या पायथ्याशी उगवते. गोल आकाराची पाने हे या झुडपी झाडाचे वैशिष्टय़ आहे. कल्याणजवळील मलंगगड, नेरळ, कर्जत आणि ठरावीक डोंगराळ भागात शेवळी ही रानभाजी आढळते. जंगलात ही भाजी उगवल्याने या मलंगगड परिसरातील स्त्रिया, आदिवासी स्त्रिया भाजी विक्रीसाठी आणत आहेत. पाऊस सुरू झाल्याने शेवळी रानभाजी सध्या कल्याण पूर्व, पश्चिमेतील रेल्वे स्थानक परिसरात, डोंबिवलीत फडके रस्ता, चिमणीगल्ली भागात उपलब्ध आहे. शेवळीची एक जुडी १८ ते २० रुपयांपर्यंत विकली जाते. भाजी कशी करतात? शेवळी भाजीची साल काढून उरलेले कोंब स्वच्छ पाण्यात धुऊन कोबीसारखे बारीक चिरून घेण्यात येते. त्यानंतर नेहमीच्या पद्धतीने शेवळीची भाजी केली जाते. या भाजीची चव वाढविण्यासाठी काकड झाडाचे फळ या भाजीत टाकले जाते. नानाबोंडा झुडपाचा पाला या भाजीत टाकला जातो.