ध्वनी पातळी ११० डेसिबलपर्यंत; सर्वाधिक प्रदूषण खोपटमध्ये ठाणे शहरात गणेशोत्सव काळात सरासरी ९५ ते १०० डेसिबलपर्यंत असलेली आवाजाची पातळी नवरात्रीच्या निमित्ताने मात्र ११० डेसिबलपर्यंत वाढल्याचे निरीक्षण डॉ. महेश बेडेकर यांनी नोंदवले आहे. गणेशोत्सवातील गणपतींच्या तुलनेत देवींची संख्या आणि मिरवणूक संख्या कमी असल्या तरी त्यांच्या आवाजाची पातळी मात्र त्यापेक्षाही जास्त होती. या आवाजामध्ये सर्वाधिक प्रमाण हे फटाक्यांचे होते, तर डीजे, बँजो यांसह वाहतूक कोंडीमुळेही आवाजाची पातळी मोठी होती. दसऱ्याच्या दिवशी बेडेकर यांनी ठाण्यातील विविध भागांमधील ध्वनीच्या पातळींची मोजदाद केल्यानंतर ही माहिती दिली. रस्त्यावर साजरे होणारे उत्सव नागरिकांना त्रासदायक ठरू नयेत यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर ठाणे महापालिकेने उत्सव साजरे करण्यासाठी नियमावली जाहीर केली होती. मात्र या नियमावलीनंतरही शहरातील अनेक मंडळांनी रस्त्यावर उत्सव साजरे करत आवाजाची कमाल पातळीही ओलांडल्याने अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान आवाजाची पातळी ओलांडल्यानंतर आता नवरात्र उत्सवाच्या दरम्यानही पातळी मोठीच होती, असे डॉ. बेडेकर यांनी सांगितले. यंदा या प्रकरणी तक्रारी करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढू लागली असून त्यामुळे पोलिसांनाही कारवाई करावी लागत होती. त्यामुळे सोसायटय़ांमध्ये होणारा त्रास कमी झाल्याचे बेडेकर यांनी सांगितले. ’गोखले रोड या शांतता क्षेत्रातील आवाजाची पातळी १०० डेसिबलपर्यंत मोठी होती. ’खोपटमध्ये सर्वाधिक ११० डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली आहे. ’जुन्या लोक रुग्णालयाजवळही आवाजाची पातळी १०० डेसिबल होती.