लोकसत्ता विशेष प्रतिनिधी ठाणे : कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका चार वर्षीय मुलीच्या जांघेमध्ये इंजेक्शन देताना सुई तुटली असून ती १६ दिवस होऊनही काढण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यमांद्वारे केला आहे. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने मात्र आरोप फेटाळून लावत मुलीची प्रकृती ठिक असल्याचे स्पष्ट केले आहे. ठाणे येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये एक चार वर्षीय मुलगी उपचारासाठी दाखल आहे. या मुलीला जांघेमध्ये इंजेक्शन देत असताना सुई तुटली. १६ दिवसानंतरही सुई तिथेच आहे. कोणी लक्ष द्यायला तयार नाही. ती सुई काढण्यासाठी छोटी शस्त्रक्रीया करावी लागेल, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु त्यासाठी रुग्णालयामध्ये डॉक्टरही नाहीत. आता त्या मुलीचा पाय सुजायला लागला आहे. जर त्याच्यात काही बरेवाईट झाले तर त्या मुलीचा पाय कापावा लागेल, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. इतका निष्काळजीपणा डॉक्टर्स कसे काय करू शकतात आणि मुख्य म्हणजे इंजेक्शन देत असताना सुई तुटतेच कशी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आणखी वाचा-“…म्हणूनच मुंबईतील हिरे बाजार सुरतला नेण्यात आला”, जितेंद्र आव्हाड यांचे विधान रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हे आरोप फेटाळून लावले. ते इंजेक्शनची सुई नसून गाईड वायर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिनाभरापुर्वी ही मुलगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. तिला निमोनिया झाला असून तीला कृत्रिम श्वसन यंत्रणा लावण्यात आली होती. उपचारादरम्यान गाईड वायर तिच्या जांघेत अडकली. पण, त्याचा तिला काहीच धोका नाही. अनेकदा असे प्रकार घडतात. परंतु त्याचा रुग्णाला काहीच त्रास होत नाही. या मुलीचा जीव वाचविणे महत्वाचे असल्याने तिच्यावर आधी उपचार करण्यात आले. तिची प्रकृती आता ठिक असून गाईड वायर काढण्यासाठी तिला जेजे रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.