ठाणे : ओबीसींचा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असल्याची चर्चा असतानाच, प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीने ठाणे लोकसभेच्या रिंगणात उमदेवार उतरविला आहे. धनगर समाजाचे मल्लिकार्जुन पुजारी यांना उमेदवारी देण्यात आली असून यामुळे ही निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात आगरी, कोळी आणि कुणबी समाजाची संख्या मोठी आहे. यामुळेच ओबीसींचा जिल्हा अशी ठाण्याची ओळख आहे. जिल्ह्यात ठाणे, भिवंडी आणि कल्याण असे तीन लोकसभा मतदारसंघ येतात. या तिन्ही मतदारसंघात आगरी, कोळी आणि कुणबी समाज महत्वाची भूमिका ठरविताना दिसून येतो. यामुळे निवडणूक काळात या तिन्ही समाजाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. आपल्या समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळावी, यासाठी हे समाज प्रमुख पक्षांकडे आग्रह धरताना दिसून येतात. यंदाच्या निवडणुकीत हे चित्र कायम आहे.

हेही वाचा – बदलापुरात वीज, पाण्यावाचून नागरिकांचे हाल; मध्यरात्री वीज गायब, दिवसाही घामांच्या धारात

कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केले आहेत. ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने उमदेवार जाहीर केला आहे तर, महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. महायुतीचा उमदेवार कोणत्या पक्षाचा असणार आणि कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असल्याची चर्चा असून त्यातच आता प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीने ठाणे लोकसभेच्या रिंगणात उमदेवार उतरविला आहे.

हेही वाचा – ठाणे : विमान कंपनीतील कर्मचाऱ्याची ३७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

धनगर समाजाचे मल्लिकार्जुन पुजारी यांना उमेदवारी देण्यात आली असून याआधी देखील मल्लिकार्जुन पुजारी यांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे. यामुळे ही निवडणूक आणखी रंगतदार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. ओबीसी बहुजन पार्टीने उमदेवार दिला असून यामुळे ठाणे लोकसभा निवडणुकीत जातीचे कार्ड चालणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.