कल्याण- कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागातील कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये रिक्षा चालकांनी कोणतेही कारण न देता मीटर पध्दतीने प्रवासी वाहतूक सुरू करावी, असे आदेश कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी (अतिरिक्त कार्यभार) यांनी रिक्षा संघटनांच्या मंगळवारी घेतलेल्या बैठकीत दिले. प्रत्येक रिक्षा चालकाने मीटर पध्दतीने प्रवासी वाहतूक करावी. ज्या प्रवाशांना भागीदारी (शेअर) पध्दतीने प्रवास करायचा असेल त्यांना त्यांच्या मागणी प्रमाणे प्रवास घडून आणावा. कोणीही रिक्षा चालकाने मनमानी पध्दतीने भाडे वाढ करून प्रवाशांना उपद्रव देऊ नये. जे रिक्षा चालक, रिक्षा संघटना मनमानी करून भाडे वाढीचा प्रयत्न करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा साळवी यांनी रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींना दिला. गेल्या आठवड्यात डोंबिवलीत रिपब्लिकन रिक्षा चालक मालक युनियनचे रामा काकडे, विकास देसले यांनी मनमानी करून रिक्षा भाडेवाढ जाहीर केली. तसे फलक डोंबिवली पूर्वेतील रिक्षा वाहनतळावर लावले. सीएनजीचे दर वाढल्याने चालू भाडे दरात प्रवासी वाहतूक करणे रिक्षा चालकांना शक्य नसल्याने प्रवाशांनी वाढीव भाडे वाढीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन काकडे यांच्या रिक्षा संघटनेने केले होते. अचानक ही दरवाढ केल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याविषयी परिवहन आयुक्त, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे प्रवाशांनी तक्रारी केल्या. या भाडे वाढीची कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. चालू भाड्यात दोन रूपयांची वाढ रिक्षा चालकांनी केली होती. या भाडेवाढीवरून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी रिक्षा संघटना पदाधिकारी रामा काकडे यांनी कानऊघडणी केली. यावेळी तो फलक आपण लावलाच नव्हता असा पवित्रा काकडे यांनी अधिकाऱ्यांसमोर घेतला. त्यामुळे त्यांची कारवाईतून सुटका झाली. कल्याण, डोंबिवलीतील अनेक रिक्षा चालक मनमानी करून भाडे आकारत असल्याच्या असंख्य तक्रारी आरटीओ अधिकाऱ्यांकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी कल्याण येथील आरटीओ कार्यालयात एक बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी साळवी, कार्यालयीन अधिकारी रवींद्र कुलकर्णी, दीपक गांगुर्डे, रिक्षा संघटनेचे शेखर जोशी, दत्ता माळेकर, अंकुश म्हात्रे, भिकाजी झाडे, संतोष नवले, जितू पवार उपस्थित होते. प्रवासी भाडेवाढीसाठी पुढाकार घेणारे रिपब्लिकन रिक्षा संघटनेचे अध्यक्ष रामा काकडे बैठकीला अनुपस्थित होते. रिक्षा चालकांनी प्रस्तावित भाडे दराप्रमाणे प्रवासी वाहतूक करावी. मनमानीने भाडे आकारू नये. मीटर प्रवासी वाहतुकीला सर्वाधिक प्राधान्य द्यावे. मनमानीने भाडे आकारले तर कायदेशीर कारवाई केली जाईल. विनोद साळवी, प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कल्याण