ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू असतानाही आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी शिवसेनेचे माजी महापौर आणि नगरसेवकांसमवेत विकासकामांचा पाहाणी दौरा केला. या दौऱ्यावरून भाजपाने आयुक्तांसह शिवसेनेवर निशाणा साधत टीका केली आहे. आयुक्त शिवबंधनात अडकले आहे का? तसेच, शिवसेनेचे पदाधिकारी स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराचीही जबाबदारी घेणार का? असे प्रश्न भाजपाने उपस्थित केले आहेत. त्यास शिवसेनेने प्रत्युत्तर देत भाजपावर निशाणा साधला आहे. यामुळे आयुक्तांच्या दौऱ्यावरून आता शिवसेना आणि भाजपात जुंपल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कोपरी भागात खाडी सुशोभिकरणाचे काम सुरु असून, या कामाबरोबरच अन्य कामांचा आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सोमवारी पाहणी दौरा केला. या दौऱ्याला माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह शिवसेनेचे काही माजी नगरसेवक उपस्थित होते. या दौऱ्यावरूनच आता शिवसेना आणि भाजपामध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. महापालिकेवर प्रशासकीय राजवट लागू असताना, आयुक्तांकडून निपक्षपातीपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी ठाणे महापालिकेवर प्रशासकीय राजवट असताना, तत्कालीन आयुक्तांनी कोणत्याही पक्षाला प्राधान्य देऊ नये या नियमाचे काटेकोरपणे पालन केले होते. परंतु विद्यमान आयुक्तांनी पाहणी दौऱ्यात शिवसैनिकांना निमंत्रित करून प्रशासकीय धक्का दिला. या दौऱ्याची केवळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती कळविण्यात आली होती का? आयुक्तांच्या दौऱ्यावेळी पदाधिकारी कसे पोहचले? आयुक्तांनी शिवबंधन बांधले आहे का? असे प्रश्न भाजपाचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुजय पतकी यांनी विचारले आहेत. शिवसेना पदाधिकारी स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराचीही जबाबदारी घेणार का? - भाजपाचे कोपरीतील माजी नगरसेवक भरत चव्हाण यांना दौऱ्याची माहिती मिळाल्यानंतर ते घाईघाईत दौऱ्याच्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांना आयुक्तांचा हा पाहणी दौरा असल्याचे निदर्शनास आल्यावर ते निघून गेले, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आयुक्त शर्मा यांच्या दौऱ्यावेळी एकाच वेळी माजी महापौरांसह शिवसेनेचेच माजी नगरसेवक उपस्थित राहतात. हा योगायोग नक्कीच नव्हे, तर शिवसेनेला श्रेय देण्यासाठीच आयुक्तांनी नियोजन करूनच हा दौरा केला का? तसेच कामांचे श्रेय घेण्यासाठी धडपड करणारे शिवसेना पदाधिकारी स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराचीही जबाबदारी घेणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. आधी निवडणूक लढावी आणि मगत पालिकेच्या कारभारावर बोलावे - नरेश म्हस्के “ठाणे महापालिकेत मी गेली २० वर्षे नगरसेवक म्हणून कार्यरत आहे. तसेच महापौरही होतो. त्यामुळे शहरात जी कामे सुरु आहेत, त्यावर देखरेख ठेवणे ही ठाणेकर म्हणून माझी जबाबदारी आहे. महापौर पदावर नसलो तरी त्याच जबाबदारीतूनच मी आजही काम करीत आहे. नगरसेवकांची पंचवार्षिक मुदत संपली असली तरी ते प्रशासन आणि नागरिकांचा दुवा म्हणूनच काम करीत आहेत. त्यामुळेच आम्ही दौऱ्याला उपस्थित होतो. भाजपाने सातत्याने स्मार्ट सिटीच्या कामांवर टीकाच केली आहे. तसेच भाजपामधून वर्षोनुवर्षे निवडूण येणाऱ्या लोकप्रतिनिधींपेक्षा मला जास्त कळते आणि मी ग्रेट आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न सुजय पतकी यांच्याकडून सुरु आहे. त्यांनी आधी निवडणूक लढावी आणि मगत पालिकेच्या कारभारावर बोलावे. कागदी घोडे नाचविणाऱ्या अशा बोरूबह्हादरांविषयी आम्हाला प्रतिक्रीया देण्याची गरज वाटत नाही.”अशा शब्दांमध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिले आहे.