ठाणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तरेतून येणाऱ्या कोरडय़ा उष्ण वाऱ्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. शुक्रवारी ठाणे शहरात ४४.३ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. शीळ काटई रस्त्यावर पलावा परिसरात ४३ अंश सेल्सिअस, भिवंडी आणि कल्याण शहरात ४२ अंश सेल्सिअस, उल्हासनगर शहरात ४२ अंश सेल्सिअस तसेच तळोजा, डोंबिवली, बदलापूर आणि पनवेल भागात ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सकाळच्या वेळेत ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर कडक ऊन यामुळे उकाडा वाढला आहे. रात्रीच्या वेळेतही उष्णतेची दाहकता जाणवत आहे. वाढत्या तापमानामुळे अगांची काहीली होऊ लागली आहे. मुंबईत घट मुंबई आणि परिसरात गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारच्या कमाल तापमानात साधारण तीन अंशांची घट होऊन शुक्रवारी सरासरी ३४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद कुलाबा केंद्रात करण्यात आली. सांताक्रुझ केंद्रातील नोंदीनुसारही गुरुवारच्या तुलनेत तापमान काही अंशांनी कमी झाले. गुरूवारी सरासरी ३८.९ सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती तर शुक्रवारी सरासरी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.