शिवसेनेचे ‘मिशन कळवा’ तर, राष्ट्रवादीचे ‘कमिशन टीएमसी मिशन’ ठाणे : शिवसेनेच्या नेत्यांनी ‘मिशन कळवा’चा नारा देताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘कमिशन टीएमसी मिशन’ राबविण्याची घोषणा केली आहे. यामध्ये विविध प्रकल्पांच्या कामांत घेण्यात आलेल्या दलालीबाबत प्रत्येक प्रभागात जनजागृती करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्याला शिवसेनेने प्रतिउत्तर देत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप केले. यामुळे शिवसेना -राष्ट्रवादी या मित्र पक्षांमध्ये ठाण्यात मात्र पालिका निवडणुकांच्या तोंडावर तणाव वाढू लागला आहे. राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या मिशन कळवा अभियानाला प्रतिउत्तर देत ‘कमिशन टीएमसी मिशन’ची घोषणा केली. शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख आणि महापौर नरेश म्हस्के यांनी येणाऱ्या वर्षांमध्ये मिशन कळवा राबवून संपूर्ण कळव्यात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणू, अशी घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे येत्या आठवडय़ात शिवसेना मिशन मुंब्रा सुरू करणार आहे. म्हस्के यांच्या या घोषणेचे स्वागतच आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. जिल्हाप्रमुख म्हणून त्यांच्यावर ती जबाबदारी आहे, असे सांगत राष्ट्रवादी कमिशन टीएमसी अभियान राबविणार असल्याचे परांजपे यांनी स्पष्ट केले. या अभियानात शौचालय, कचरा, रस्ते, परिवहन सेवा, पाणी आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांत जी दलाली घेण्यात आली, त्याबाबत प्रत्येत वॉर्डात जनजागृती मोहीम सुरू करणार आहे. त्याची उत्तरे देताना महापौर म्हस्के यांचे राजकीय कसब पणास लागेल, याचा आपणाला विश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले. आम्ही ‘कमिशन टीएमसी मिशन’ राबविले तर, तुम्हाला ठाणेकरांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा टोलाही परांजपे यांनी लगावला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आदेश दिले तर आम्ही आघाडी करायला तयार आहोत. राष्ट्रवादी सध्या सक्षम विरोधी पक्ष आहे. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवू, असेही त्यांनी सांगितले. शिवसेनेचे आनंद परांजपेंवर आरोप लोकसभा निवडणुकीत आनंद परांजपे यांचा दोनदा पराभव केल्यामुळेच ते खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करीत आहेत. परांजपे यांनी खासदार असताना काय कामे केलीत, ती जाहीर करावे. त्याआधारे आम्हाला मिशन कमिशनचा अंदाज लावता येईल. तसेच मित्तल टीडीआर घोटाळा चौकशीसंदर्भात परांजपे यांनी पत्र दिले होते. त्याचे पुढे काय झाले हेही त्यांनी जाहीर करावे, असे शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी सांगितले. मुंब्रा रुग्णालयाचा खर्च ५४ कोटी वरून १४८ कोंटीवर कसा गेला, हेही त्यांनी जाहीर करावे. घनकचरा खासगीकरण करण्यासंबंधीच्या प्रस्तावात अटी व शर्ती टाकण्यासाठी कोण पालिकेत फिरत होता, हेही सांगावे, असे आव्हान शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांनी दिले.