ठाणे : शहापूर तालुक्यातील ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे. त्या गाव – पाड्यासाठी पंधरा दिवस आधी प्रस्ताव सादर करून एक दिवस आधीच टॅंकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन जिल्हा परिषद आणि जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. शहापूर तालुक्यातील तीव्र पाणी टंचाई बाबत लोकसत्ता मध्ये नुकतेच वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. यानंतर जाग आलेल्या प्रशासनाने शहापूर मधील पाणी टंचाई बाबत तातडीने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी नुकतीच शहापूर पंचायत समिती येथे पाणी टंचाईबाबत तातडीची आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी त्यांनी शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी तातडीने उपयोजना करण्याबाबत सूचना दिल्या.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात यातही मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील नागरिकांना उन्हाळ्यात मोठ्या पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. याच पार्श्ववभूमीवर जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने या दोन्ही तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरची उपलब्धता करून देण्यात येते. मात्र या टँकरची संख्या अत्यंत तोकडी असल्याने ग्रामस्थांना मोठ्या समस्यांचा सामना कारवा लागतो. शहापूर तालुक्यातील दहा गावातील २३ हजार लोकसंख्येला केवळ २३ टँकरने पाणीपुरवठा होत असल्याचे नुकतेच समोर आले होते. लोकसत्ताने याबाबत वृत्त देखील प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शहापूर येथे नुकतीच आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी शिनगारे यांनी टँकर ग्रस्त असलेल्या एकूण ९१ गाव पाड्याची माहिती घेतली. एप्रिल महिन्यात पाणी संबंधित येणाऱ्या समस्या आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सुचना त्यांनी दिल्या. तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. त्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता नये. ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे, त्या गाव पाड्यासाठी पंधरा दिवस आधी प्रस्ताव सादर करून एक दिवस आधीच टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात याव्यात अशा स्पष्ट सूचना यावेळी त्यांनी दिल्या. तर गावातील लोकसंख्या, गावातील हातपंप संख्या, विहीरीची संख्या आणि पाण्याच्या इतर पर्याय तपासून पुढील पंधरा दिवसांत शहापूर तालुक्यातील पाणी पुरवठा संदर्भात नियोजन करण्यात यावे अशा सुचना त्यांनी उपस्थित सर्व ग्रामसेवकांना दिल्या. जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या उपायोजनांमुळे शहापूर मधील ग्रामस्थांना मुबलक पाणीपुवरठा होईल असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.

हेही वाचा : ठाणे-कल्याण यापैकी एक जागा हवी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर भाजपची अट; सूत्रांची माहिती

शहापूर तालुक्यात स्वच्छता प्रश्न महत्त्वाचा आहे. कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणे गरजेचे आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच कचरा उचलला गेल्यानंतर व आधी असे फोटो काढून फोटो संकलन करण्यात आले पाहिजे. तसेच ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असे यावेळी बैठकीत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सांगितले.

हेही वाचा : ठाणे : पाणी प्रश्नावरून श्रमजीवी संघटनेचे ग्रामपंचायतींवर मोर्चे, रिकामे हंडे घेऊन अधिकाऱ्यांना विचारला जाब

श्रमजीवी संघटनेचा हंडा मोर्चा

उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळातच शहापूर तालुक्यातील बहुतांश गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे सातत्त्याने दिसून येत होते. याच पार्श्वभूमीवर या ग्रामीण भागातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा आणि जल जीवन मिशनची प्रभावी अंमलबाजवणी होऊन ग्रामस्थांना नळाद्वारे नियमित स्वरूपात पाणी पुरवठा यावा यासाठी श्रमजीवी संघटनेने सोमवारी शहापूर तालुक्यातील वेळुरे ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता. यावेळी मोठया संख्येने महिलांनी यात सहभाग घेतला होता.