मुंबई : येत्या १ ऑगस्टपासून ठाणेकरांना अतिरिक्त ५० दशलक्ष लिटर्स (एमएलडी) वाढीव पाणीपुरवठा करण्याला जलसंपदा विभागाने बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे विस्तारित ठाणे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रश्नाचा आढावा घेताना ठाण्याता अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले होते. शहराला दररोज ४८५ दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे तोदेखील अपुरा पडू लागला होता. मध्य वैतरणा धरणाची उंची वाढवण्यात आल्याने जास्त पाणी अडवणे शक्य होणार आहे. त्यातील १०० एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा ठाण्याला करण्यात यावा, अशी मागणी महानगरपालिकेने मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केली होती. या मागणीला अनुसरून मुख्यमंत्री शिंदे यांनी हे पाणी तातडीने देण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले होते. यानुसार जलसंपदा विभागाने अतिरिक्त ५० एमएलडी पाणी देण्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ठाणे शहराला मोठा दिलासा मिळाला आहे.