लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूरः बदलापूर शहराला मुरबाड तालुका, कल्याण तालुका आणि कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या बदलापूर शहराच्या वेशीवरच्या वालिवली येथील उल्हास नदीवरील पूल पुढचा महिनाभर देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा वळसा घालून वाहतूक करावी लागणार आहे. वाहतूक विभागाने येथे वाहतुकीच्या नियोजनासाठी वाहतुकीत बदल केले आहे. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवर मात्र कोंडींची भीती आहे.

बदलापूर रेल्वे स्थानक शहरातील रेल्वे प्रवाशांसह आसपासच्या अनेक गावांसाठी महत्वाचे आहे. मुरबाड तालुका, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावे बदलापूर रेल्वे स्थानकाशी जोडले गेलेले आहेत. येथील दररोज हजारो प्रवासी बदलापूर स्थानकात येत असतात. कल्याण ग्रामीण भागातील प्रवासी बदलापूर शहरातील एरंजाड ते वालिवली या मार्गाने बदलापूर स्थानक गाठतात. तर अंबरनाथ आणि मुंबई, नवी मुंबई ठाणे या शहरातून बदलापूर शहरातून मुरबाड आणि कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी बदलापूर शहरातील बदलापूर बारवी धरण रस्ता महत्वाचा आहे.

आणखी वाचा-ठाणे: मेट्रोच्या कामादरम्यान गर्डरवरून खाली पडून कामगाराचा मृत्यू

बदलापूर शहरात जाण्याऐवजी बाहेरून वालिवली मार्गे जाणारा हा रस्ता महत्वाचा आहे. येथील वालिवली येथील उल्हास नदीवरील पूल या मार्गावरून ओलांडावा लागतो. तर परतीच्या प्रवासासाठी आणि बदलापूर शहराच्या मध्यवर्ती तसेच स्थानक परिसरातून प्रवास टाळण्यासाठी हा शहराबाहेरून प्रवास करतात. मात्र गेल्या काही वर्षात येथील पुलाची दुरावस्था झाली होती. त्यामुळे या पुलाची दुरूस्ती करण्याची मागणी केली जात होती. अखेर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने या पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. गुरूवार, ७ डिसेंबरपासून या पुलाच्या देखभाल, दुरूस्ती, पदपथ आणि पुराच्या आरसीसी संरचना सुधारणा तसेच पुनर्विकासाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या पुलावरची वाहतूक ३४ दिवस बंद केली जाणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. वाहतूक विभागाच्या ठाणे पोलीस उपायुक्त डॉ. विजयकुमार राठोड यांनी वाहतूक बदलाची अधिसूचना काढली आहे.

आणखी वाचा-मुख्यमंत्र्यांची छबी असलेली बेकायदा हातगाडी हटवली, कल्याण-डोंबिवली पालिकेची कारवाई

बदल अशाप्रकारे

मुरबाड किंवा कल्याण तालुक्यातून एरंजाडमार्गे वालिवली पुलावरून बदलापूर किंवा अंबरनाथकडे जाणाऱ्या वाहनांना बदलापूर गाव, समर्थ चौक आणि स्थानक परिसरातून प्रवास करावा लागणार आहे. तर वालिवली पुलावरून एरंजाडकडे जाणाऱ्या वाहन चालकांना वडवली – गणेश चौक – मांजर्ली – हेंद्रेपाडा मार्गे बॅरेज चौककडे जावे लागणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना यातून सूट असेल.

चाकरमानी, विद्यार्थी आणि पर्यटकांचा फेरा वाढणार

एरंजाड, सोनिवली, ढोके दापिवली आणि कल्याण तालुक्यातील गावे तसेच मुरबाड तालुक्यातील आणि बारवी धरणापर्यंतच्या गावातील चाकरमानी, विद्यार्थी आणि स्थानिकांचा याचा फटका बसणार आहे. तर नववर्षाच्या स्वागतासाठी या परिसरात शेतघरांमध्ये येणाऱ्या पर्यटकांनाही या वाहतूक बदलाचा फटका बसणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valivali bridge in badlapur closed for traffic mrj