परतीच्या पावसामुळे मळ्यांचे नुकसान, आवक ५० टक्क्यांवर ठाणे : काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बाजारात ५० टक्क्यांनी भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून घाऊक आणि किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. किरकोळ बाजारात भाज्यांचे दर ऐंशीपार गेले आहेत. राज्यातील काही भागांत झालेल्या परतीच्या पावसामुळे भाज्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यासह विक्रीसाठी तयार झालेल्या भाज्याही या पावसात खराब झाल्या आहेत. परिणामी ठाणे, मुंबई तसेच उपनगरांतील किरकोळ बाजारात भाज्यांची आवक ५० टक्क्यांनी घटली असल्याची माहिती काही किरकोळ विक्रेत्यांनी दिली. भाज्यांची आवक घटल्यामुळे भाज्यांचे दर हे ऐंशीपार पोहोचले आहेत. या पावसामुळे सर्वाधिक नुकसान पालेभाज्यांच्या पिकांचे झाले आहे. सद्य:स्थितीला बाजारात पालेभाज्या अगदी कमी प्रमाणात दिसून येत आहेत. त्यामुळे पालेभाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. सध्या किरकोळ बाजारात मेथीची जुडी ५० रुपयाने, पालक जुडी ४० रुपयाने आणि शेपूची जुडी २५ रुपयाने विक्री केली जात आहे. र्कोंथबीरची जुडी सध्या शंभर रुपयाने विक्री करण्यात येत असल्यामुळे अनेक भाजीवाल्यांच्या गाडीवरून कोथिंबीर नाहीशी झाली आहे. परतीच्या पावसामुळे भाज्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून त्यांची आवकही घटली आहे. काही भाज्यांनी शंभरी पार केली आहे. - भगवान तुपे, किरकोळ विक्रेते, ठाणे