गोडाऊनची भिंत अंगावर पडून तीन जण त्याखाली सापडल्याची घटना कल्याण पूर्वेच्या चक्की नाका भागात गुरुवारी घडली. स्थानिकांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे तिघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. गोडाऊनच्या आत झोपलेले तीन जण भिंत कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकले. स्थानिकांनी तात्काळ धाव घेत या तिघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यामुळे या तिघांचे जीव वाचवण्यात यश आले. तिघांना तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हे तिघे जण ढोल पथकातील असून, गणपती सणानिमित्त कल्याणला आले असून, रात्रीच्या वेळी या बंद गोडाऊन मध्ये ते झोपत होते. गोडाऊनची इमारत जुनी झाली आहे. त्यातच जोरदार पावसामुळे भिंत खचली आणि हा अपघात घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जखमींची नावे अद्याप समजलेली नाहीत.