उल्हास, काळू नदीच्या पुराचे पाणी पालिका जलशुध्दीकरण केंद्रात बुधवारी रात्री शिरल्याने सुरक्षिततेच्या कारणासाठी ही दोन्ही जलशुध्दीकरण केंद्रे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने रात्री बंद केली. त्यामुळे कल्याण पूर्व, पश्चिम आणि टिटवाळा शहरातील काही भागांचा पाणी गुरुवारी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पुराचे पाणी गुरुवारी पहाटेपर्यंत ओसरल्याने दोन्ही जलशुध्दीकरण केंद्रे सुरू करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली. …त्यामुळे पुराचे पाणी आले की विद्युत यंत्रणा बंद केली जाते - पुराचे पाणी जलशुध्दीकरण केंद्रात आल्याने केंद्रांचे नुकसान झाले नाही. या केंद्रातील विद्युत यंत्रणा पावसाळ्यात नद्यांना येणाऱ्या पुराच्या पाण्याचा अंदाज घेऊन उन्नत पातळीवर स्थापित केली आहे. त्यामुळे पुराचे पाणी आले की विद्युत यंत्रणा बंद केली जाते, असे मोरे यांनी सांगितले. ठेकेदाराने पालिकेला सावध केले - बुधवारी रात्री साडे नऊ वाजता टिटवाळा, मोहिली येथील १०० दशलक्ष लीटर जलशुध्दीकरण केंद्रात काळू, उल्हास नदीच्या पुराचे पाणी घुसू लागले. ठेकेदाराने पालिकेला सावध केले. पालिकेने कोणताही धोका नको म्हणून जलशुध्दीकरण केंद्रे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ही केंद्रे बंद ठेवल्यामुळे कल्याण पूर्व, पश्चिम, टिटवाळा शहरांचा काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पूर ओसरल्यानंतर हा पुरवठा सुरू करण्यात येणार होता. पाणी व कचरा बाहेर काढण्यात आला - टिटवाळा येथील जलशुध्दीकरण केंद्रात काळू नदी पुराचे पाणी घुसले होते. तेथे कोणतेही नुकसान झालेले नाही. मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्रात कचरा, गढूळ पाणी घुसले होते. हे पाणी व कचरा बाहेर काढण्यात आला आहे. नव्याने नदीचे पाणी जलशुध्दीकरण केंद्रात घेऊन ते शुध्दीकरण करून मग ते पुरवठा करण्यात आले. गुरुवारी रात्री दोन वाजता पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. पहाटेपर्यंत पूर परिस्थिती सामान्य झाली. त्यानंतर तत्काळ जलशुध्दीकरण केंद्रातील स्वच्छता, पुराचे पाणी बाहेर काढणे, कचरा बाहेर फेकण्याची कामे करण्यात आली. ही केंद्रे पहाटेपासून सुरू करण्यात आली आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी दिली. दोन्ही केंद्रे पहाटे सुरू करण्यात आल्याने पाणीपुरवठा सुरळीत - टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्रातून टिटवाळा ते आंगण सोसायटी परिसराला पाणी पुरवठा केला जातो. १०० दशलक्ष लीटर क्षमतेच्या मोहिली येथील जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण शहराच्या पूर्व, पश्चिम मधील भागांना पाणी पुरवठा केला जातो. कल्याण पश्चिमेतील घोलपनगर, मुरबाड रस्ता, योगीधाम, रामबाग गल्ली क्रमांक एक ते सहा, सिंधिगेट, फाॅरेस्ट वसाहत, मिलिंदनगर, सह्याद्रीनगर, बिर्ला महाविद्यालय रस्ता, भोईरवाडी, खडकपाडा, संतोषी माता रस्ता, रिजन्सी सोसायटी, गायत्री धाम, सावरकर नगर, इंदिरा नगर, बल्याणी, मोहिली, गाळेगाव, आर.एस. टेकडी, मोहने, अटाळी, वडवली, शहाड, अंबिवली, उंबारणी गाव भागाचा, कल्याण पूर्वेतील अशोकनगर, वालधुनी परिसराचा पाणी पुरवठा बुधवारी रात्री बंद ठेवण्यात आला होता. दोन्ही केंद्रे पहाटे सुरू करण्यात आल्याने या भागाचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे, असे कार्यकारी अभियंता मोरे यांनी सांगितले. उल्हास, काळू नदीला पूर आल्याने मोहिली, टिटवाळा येथील जलशुध्दीकरण केंद्रे बधुवारी बंद ठेवण्यात आली होती. गुरुवारी पहाटेपर्यंत पुराचे पाणी ओसरले. दोन्ही केंद्रांमध्ये स्वच्छता करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.